
साताऱा, २५ मार्च (वार्ता.) – येथील कोरेगाव नगरपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्हधिकारी यांच्या स्तरावर चौकशी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेमध्ये दिली. विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी याविषयाची लक्षवेधी सूचना विधान परिषदेमध्ये मांडली होती. या वेळी कोरेगाव नगरपंचायतीने एकाच कामाची देयके दोन वेळा दिलेली नसल्याचेही उत्तरामध्ये मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.