Kailash Vijayvargiya : ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझे नाव ‘कलीमुद्दीन’ असते !’

शिवजयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री कैलास विजयवर्गीय यांचे विधान

भाजप सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय

इंदूर (मध्यप्रदेश) – जर आज हिंदु धर्म जिवंत असेल, तर त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण माळवा प्रांतात मोगलांना प्रवेश करू दिला नाही. म्हणूनच आज आपण हिंदू आहोत, अन्यथा माझे नावही कैलास नाही, तर ‘कलीमुद्दीन’ असते, असे विधान राज्यातील भाजप सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी येथे केले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.

विजयवर्गीय यांनी पुढे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सैन्य उभारले होते. त्या काळात त्या सैन्याने मूठभर संख्या असूनसुद्धा लाखोंच्या संख्येने असलेल्या मोगलांना पराभूत केले. अशी एक नाही, तर अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करत आहोत, याचा मला अभिमान आहे. आज संपूर्ण हिंदु समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा आभारी आहे. त्या काळात बाजीराव पेशव्यांच्या सैन्याने कोणत्याही मोगलाला येथे येऊ दिले नाही. हे आपला इतिहास सांगतो.