रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्ग पूर्ण होण्यास आणखी ३ वर्षे लागणार !

मुंबई – मागील ३० वर्षे प्रलंबित असलेला रेवस (जिल्हा रायगड) ते रेडी (जिल्हा सिंधुदुर्ग) हा सागरी महामार्ग पूर्ण व्हायला आणखी ३ वर्षे लागतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी २५ मार्च या दिवशी सभागृहात दिली.

याविषयी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री भुसे यांनी सांगितले की,  या महामार्गाचे काम २ टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. या महामार्गावर एकूण ९ पूल आहेत. त्यांतील ५ पुलांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

२ पुलांचे काम चालू आहे, तर दाभोळ आणि काळबादेवी येथील पुलांच्या कामामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. प्रलंबित पुलांसाठी भूसंपादन चालू आहे.