ग्रहशांतीसाठी नामजप आणि शांतीविधी केल्‍यानंतर श्री. योगेश जलतारे यांना जाणवलेले पालट !

१. जन्‍मपत्रिकेनुसार विशिष्‍ट ग्रहांचा जप करू लागल्‍यावर शारीरिक त्रास न्‍यून होऊ लागणे

श्री. योगेश जलतारे

‘माझ्‍या जन्‍मपत्रिकेत मला होणारे शारीरिक त्रास आणि साधनेमध्‍ये प्रारब्‍धामुळे येणारे अडथळे दूर होण्‍यासाठी विशिष्‍ट ग्रहांचा जप आणि ग्रहशांती करण्‍यास सांगितले होते. त्‍याप्रमाणे मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्‍या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्‍या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्‍यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्‍यल्‍प झाले, उदा. मी साधना वाढवण्‍यासाठी प्रयत्न चालू करताच, मला ‘सर्दी पडसे किंवा पित्त प्रकोप, वातविकार बळावणे’ इत्‍यादी विविध त्रास होऊन प्रयत्नांमध्‍ये खंड पडत असे. हे सर्व त्रास जप चालू केल्‍यावर न्‍यून झाले. पूर्वी नामजप करतांना मला देवाविषयीचा भाव अनुभवता येत नसे, तो अनुभवता येऊ लागला.

२. शांतीविधी झाल्‍यानंतर शारीरिक त्रास सुसह्य होऊन मनाची अंतर्मुखता वाढणे

७.१.२०२५ या दिवशी शांतीविधी झाल्‍यानंतर ग्रहांचा जप करतांना होऊ लागलेले सर्व लाभ अधिक चांगल्‍या प्रकारे अनुभवता येऊ लागले. ‘माझ्‍या मनाची स्‍थिरता आणि अंतर्मुखता वाढत आहे’, असे माझ्‍या लक्षात येत आहे. शारीरिक त्रास झाले, तरी ते सुसह्य आहेत आणि साधनेमध्‍ये त्‍यामुळे अडथळे येणे अल्‍प झाले आहे. मनाचा उत्‍साह वाढत आहे. गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच मला ‘माझ्‍या साधनेतील अडथळे कोणत्‍या गोष्‍टीमुळे होत आहेत’, हे लक्षात आले आणि त्‍यावर उपायदेखील त्‍यांनीच करवून घेतलेत’, यांसाठी मी त्‍यांच्‍या चरणी अनन्‍यभावे कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके. (२१.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक