
१. वडिलांची झालेली गंभीर स्थिती
‘देव तारी त्याला कोण मारी’ या वचनाची प्रचीती मला माझ्या बाबांच्या (श्री. अशोक मनगोळी (वय ७५ वर्षे) यांच्या) आजारपणात घेता आली. माझ्या बाबांची शारीरिक स्थिती अत्यंत गंभीर झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले होते. बाबा ‘लाईफ सपोर्ट सिस्टिम’वर (आपत्कालीन स्थितीमध्ये व्यक्तीचे रक्षण करणारी यंत्रणा) असूनही त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक होत नव्हते. (सर्वसाधारणतः व्यक्तीच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ ते १०० टक्के असते.) बाबांच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण ६.५ झाल्यामुळे त्यांची दोन्ही मूत्रपिंडे कार्यरत नव्हती. (सर्वसाधारणपणे निरोगी पुरुषाच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण ०.७ ते १.३ मिलीग्रॅम प्रती डेसिलीटर असते.) बाबांकडून तज्ञ आधुनिक वैद्यांच्या उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. त्या वेळी मी गुरुमाऊलींना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) शरण जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर मी सौ. प्रीती कुलकर्णी आणि पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत) यांना संपर्क करून सर्व सांगितले. पू. मनीषाताईंनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी बोलून आम्हाला नामजपादी उपाय सांगितले.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर वडिलांच्या शारीरिक स्थितीत सुधारणा होणे
सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेला नामजप चालू केल्यानंतर आम्हाला बाबांच्या शारीरिक स्थितीत सकारात्मक पालट दिसू लागला. गुरुमाऊली आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने बाबा बरे होऊन सुखरूप घरी आले. बाबा रुग्णालयातून घरी येत असतांना आधुनिक वैद्यांनी मला ‘तुमच्या बाबांचे ‘डायलिसिस’(टीप) करावे लागेल’, असे सांगितले होते; मात्र केवळ गुरुकृपेमुळे बाबांच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण न्यून होऊन २.५ पेक्षा अल्प झाले. गुरुमाऊली आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने बाबा रुग्णालयातून घरी आल्यापासून २ मासांमध्ये बाबांचे एकदाही ‘डायलिसिस’ करावे लागले नाही. आता त्यांची प्रकृती स्थिर रहाण्यासाठी सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेला नामजप माझी आई (सौ. आसावरी मनगोळी, वय ६८ वर्षे) प्रतिदिन २ घंटे करत आहे. (टीप : डायलिसिस – मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया.)
३. ‘गुरुदेव सूक्ष्मातून सतत समवेत असतात’, याची प्रचीती येणे
‘घरातील एक व्यक्ती साधना करत असेल, तर गुरुमाऊली संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात’, या वचनाची मला प्रचीती आली. साधकांनी केलेल्या साहाय्यामुळे ‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा । कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ।। सनातन धर्म माझे नित्य रूप । त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।’ या गुरुमाऊलींच्या वचनाची मला अनुभूती आली. ‘साधकांच्या रूपाने गुरुदेव सतत आमच्या समवेत आहेत’, याची मला जाणीव होत होती.
४. आधुनिक उपचारपद्धतीच्या मर्यादा लक्षात येणे आणि गुरुकृपेचे जाणवलेले महत्त्व !
आधुनिक उपचार पद्धतीला मर्यादा आहेत. औषधोपचार करण्यासह नामजपादी उपाय श्रद्धा ठेवून केले, तर अत्यंत कठीण परिस्थितीतूनही गुरुमाऊली आपल्याला अलगद बाहेर काढतात. आपत्काळामध्ये गुरुमाऊलीच आपल्याला तारून नेणार आहेत. पुढे येणार्या आपत्काळामध्ये औषधोपचार मिळाले नाही, तरीही ‘नामावरील श्रद्धा आणि गुरुमाऊलींचा संकल्प’ यांमुळे साधकांचे रक्षण होईल’, अशी माझी श्रद्धा दृढ झाली.
ही अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुमाऊली, सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. मनीषाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अभिजीत मनगोळी, पुणे (२.२.२०२५)
|