सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रचाराच्या कार्याला आरंभ केला. त्या वेळी त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, सार्वजनिक प्रवचने करणे’, असे अनेक मार्ग अवलंबले. आरंभापासूनच ‘शंकानिरसन आणि चांगला साधक कसे व्हायचे ?’, हे सांगणे’, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. ‘साधकांच्या साधनेबद्दलच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर होण्यासाठी उपाय सांगणे’, हा त्यांचा स्थायीभाव आहे. या लेखात विविध प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही उपयुक्त सूत्रे २२ एप्रिल या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे येथे दिली आहेत. (भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/905631.html

८. ‘मनाला नामजपात गुंतवून ठेवणे’, हे नामजप करण्यामागील शास्त्र असल्याने नामजप होणे महत्त्वाचे !

वैद्या (कु.) शर्वरी बाकरे (आताच्या वैद्या (सौ.) शर्वरी अमोघ जोशी)) : काही वेळा माझ्याकडून ‘परम पूज्य, परम पूज्य…’, हा जप होतो. तो जप होत असतांना मला पुष्कळ आनंद मिळतो. त्या वेळी माझ्या तोंडात गोड चव असते. तेव्हा मला असे जाणवते की, तुम्ही तेथे आला आहात आणि माझ्याकडून नामजप करून घेत आहात. त्या वेळी तो जप थांबवायला पाहिजे कि नको ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. काही मास प्रयत्न करावा आणि त्याने नाही जमले, तर जो जप होईल तो करावा. मुख्य काय ? मनात मायेतले विचार यायला नकोत. आपल्याला मन जपात गुंतलेलं ठेवायचे आहे. हे त्यातलं खरं शास्त्र आहे !
‘जप होत आहे’, हे महत्त्वाचं ! ‘कोणता जप होत आहे ?’, याला अधिक महत्त्व नसतं आणि ‘जो नामजप होतो, तो भावपूर्ण होणे’, हे सगळ्यांत महत्त्वाचं !
९. घरच्या वातावरणापेक्षा आश्रमाचे वातावरण अधिक सात्त्विक असल्याने ते साधनेसाठी उपयुक्त असते !
श्री. श्रीपाद बाकरे : ‘माझी साधना अपेक्षित अशी होत नाही, तर मी आश्रमात जाऊन काय करणार ?’, असे मला वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अहो, घरी राहून जे होत नाही ना, ते आश्रमात येऊन हळूहळू व्हायला लागते. घरापेक्षा आश्रमाचे वातावरण अधिक सात्त्विक असते. हे तुम्ही अनुभवले आहे का ?
श्री. श्रीपाद बाकरे : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सात्त्विक वातावरणातच साधना होते. बाकीचे लोक तीर्थक्षेत्री जाऊन साधना का करतात ? घरी साधना होत नाही; म्हणून! आता आश्रमात आल्यावर तुम्ही अनुभव घ्या ना ! माझी साधना असली, तर मी आश्रमात जाईन, त्यापेक्षा साधना होत नाही; म्हणून आश्रमात यायला पाहिजे. कळले का ?
श्री. श्रीपाद बाकरे : हे सगळे म्हणतात, ‘‘४ दिवस आश्रमात येऊन तरी बघा’’; पण येणे होत नव्हते; पण आता तुम्हीच शक्ती दिलीत आणि मला येथे आणलेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता आश्रमात आल्यावर बरे वाटले ना ?
श्री. श्रीपाद बाकरे : आल्यावर बरे वाटले. आता अधूनमधून घरी जाईन आणि पुन्हा अधूनमधून आश्रमात येईन.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वेळ घ्यायला नको; म्हणून रामनाथी आश्रमात येऊनही त्यांची भेट न घेणारे श्री. श्रीपाद बाकरे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (श्री. श्रीपाद बाकरे यांच्या मुलीला (वैद्या (कु.) शर्वरी बाकरे (आताच्या वैद्या (सौ.) शर्वरी जोशी) यांना उद्देशून)) : एका साधकाने मला सांगितले की, बाकरेकाका आश्रमात आले आहेत. तेव्हा मी म्हणालो, ‘‘अरे, मी त्यांना अजून भेटलो कसा नाही ?’’ तेव्हा तो साधक म्हणाला, ‘‘त्यांना तुम्हाला भेटायचे नाही.’’ बाकरेकाकांच्या बोलण्यामागील मुख्य भाव आहे, ‘माझा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) वेळ कशाला घालवायचा ? आपण आपली साधना करूया !’, असा त्यांचा दृष्टीकोन होता. तोही साधनेतलाच दृष्टीकोन आहे ना ! छान आहे अगदी सगळे.
११. घराच्या अवतीभोवती जंगल असल्याने तेथे जंगली प्राण्यांचा वावर असणे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने जंगली प्राण्यांपासून रक्षण होणे
सौ. मंजिरी बाकरे : आम्ही साखळी (गोवा) येथील घरामध्ये रहायला आलो. तेथे घराच्या अवतीभोवती जंगल आहे. तुम्हीच आम्हाला तेथे अगदी फुलासारखे ठेवले आहे. पूर्वी आम्ही अध्यात्मप्रसाराच्या सेवेला जात होतो. रात्री ८.३० – ९ वाजता घरी यायचो. तेव्हा आमच्या घराच्या फाटकावरून उडी मारून वाघ आमच्या समोरूनही गेलेला आहे; पण आम्हाला कधीच भीती वाटली नाही. आतापर्यंत तुम्हीच आमचे रक्षण केले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही साधनेने संकटांवर मात केली !
श्री. श्रीपाद बाकरे : आम्ही सत्संग घ्यायला जायचो. रात्री येतांना आमच्या समोरून अजगर जायचा; पण आम्ही कधी त्याला त्रास दिला नाही आणि त्यानेही आम्हाला त्रास दिला नाही. ही जनावरे कधीच आमच्या घरात आली नाहीत. आम्हाला त्यांची भीती मुळीच वाटली नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण सगळे घाबरून जाऊ हो वाघ आला की ! साधनेत केवढे पुढे गेलात !
सौ. मंजिरी बाकरे : परम पूज्य, तेथे एक माकड आणि कुत्रा यायचे अन् ते एकमेकांशी खेळायचे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही सगळीकडे प्रेम पेरले आहे ना ! ते आता उगवले.
सौ. मंजिरी बाकरे : आमच्या घराच्या अंगणात मोर येऊन नाचतात. केवळ आणि केवळ तुमचेच अस्तित्व तेथे असल्यामुळे हे आहे आणि काहीच नाही.
१२. रुग्णाईत असतांना आश्रमात आल्यावर तेथील चैतन्याने बरे वाटणे आणि नंतर आश्रमजीवन आवडू लागणे

सौ. पुष्पा पराडकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७५ वर्षे) : २ वर्षांपूर्वी मी रुग्णाईत होते. त्या वेळी मला वाटायला लागले, ‘आता मला अध्यात्मप्रसाराची सेवा करता येणार नाही.’ नंतर माझ्या मुलाने मला ८ – ८ दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आणले. ‘तू रुग्णाईत आहेस, तर आश्रमात तुला चैतन्य मिळेल. तुला बरे वाटेल’, असे तो म्हणायचा आणि मला तसा अनुभवही आला.
आरंभी मला आश्रमजीवन एवढे आवडत नव्हते. मला आश्रमातील जेवण जात नव्हते. माझ्या मनात ‘घरी जाऊया’, असा विचार यायचा; पण आता घरी गेले की, ‘आश्रमातच यावे’, असे मला वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण आता आवडी-नावडीच्या पलीकडे जायला शिकलात. ‘असंच जेवण पाहिजे’, असे आता वाटत नाही.
सौ. पुष्पा पराडकर : आता मला आश्रमातलेच जेवण आवडते. येथे पुष्कळ साधकही भेटतात ना ! मला पूर्वीपासून ‘मोठे कुटुंब असावे’, असे वाटायचे. आमचे कुटुंबही मोठे आहे; पण आश्रम हे त्याच्याहून मोठे कुटुंब आहे. आता पुष्कळ चांगले वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान प्रगती आहे अगदी !
सौ. पुष्पा पराडकर : मला पूर्वी यजमानांची (श्री. माधव पराडकर यांची) काळजी वाटायची. आता मला कसली आसक्ती राहिली नाही. माझ्या मनात काळजीचा विचार येत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : म्हणून तर तुम्ही ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलीत ना ! खूपच छान ! आणि नामजपही चालू असतो ना सारखा ?
सौ. पुष्पा पराडकर : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आणि काय पाहिजे ?
सौ. पुष्पा पराडकर : भावजागृतीही पुष्कळ वेळा होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : घरी राहून कसे शिकलात एवढे सगळे ?
सौ. पुष्पा पराडकर : आपणच शिकवलं.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हेही वाक्य कुणाकडून तरी शिकलात ना ? फारच छान आहे सगळे !
(समाप्त)