काशीच्या धर्तीवर व्यवस्था करण्याची मागणी

गाणगापूर, २२ एप्रिल (वार्ता.) – कर्नाटकातील अफझलपूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री दत्तक्षेत्र गाणगापूरमध्ये भाविक आणि भक्त यांसाठी सुविधा पुरवण्यात याव्यात अन् परिसराचा विकास व्हावा, यासाठी भाविक आणि ग्रामस्थ यांनी बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे. १७ एप्रिलपासून मंदिराच्या समोरील जागेत भाविक, मंदिराचे पुजारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत. सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार नाटीकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
गाणगापूर तीर्थक्षेत्र श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य आणि अवतार कार्य यांनी पावन झाले आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुका असून वाईट शक्तींचा त्रास असणार्या व्यक्ती येथे येऊन वास्तव्य करून आणि साधना करून त्रासमुक्त होतात, अशा अनुभूती अद्यापही घेत आहेत. या स्थानी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशातील सहस्रो दत्त भक्त आणि भाविक प्रतिदिन मंदिरात दर्शनासाठी येतात; मात्र गाणगापूर येथे आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विविध राज्यांतून येणारे सहस्रो भाविकांना कोणत्याही किमान सुविधांविना येथे रहावे लागते, अशी परिस्थिती आहे. जनता दलाचे नेते आणि खासदार एच्.डी. देवगौडा यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र पाठवून या तीर्थक्षेत्राचा विकास करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
गाणगापूर येथील आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सध्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग निमुळता असून दोन्ही बाजूंनी दुकाने, घरे यांच्या दाटी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘श्री क्षेत्र गाणगापूर विकास प्राधिकरणा’ची स्थापना करण्यात यावी, दत्तमंदिर आणि भीमा-अमरजा या संगम स्थानाजवळील मंदिर नव्याने आणि चांगल्या प्रकारे बांधण्यात यावे. काशीच्या धर्तीवर येथे सुसज्ज कॉरिडॉर असावा, भक्तांसाठी भक्तनिवास, मोठे वाहनतळ, सुसज्ज महाप्रसाद वितरण केंद्र, शौचालये, स्नानगृहे, साहित्य ठेवण्यासाठी खोल्या असाव्यात. भीमा-अमरजा संगम क्षेत्री नदीतील अस्वच्छता दूर करावी आणि तेथे सुंदर मंदिर बांधण्यासह चांगले घाट बांधावेत.
गाणगापूर येथून महाराष्ट्रात जाण्यासाठी बसगाड्यांची संख्याही पुरेशी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून तेथे जाणे आणि येणे यांसाठी भाविकांची गैरसोय होते. या बसगाड्यांची संख्याही वाढवण्याची भाविकांनी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल कर्नाटकमध्ये हिंदूंना त्यांच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी धरणे आंदोलन करावे लागणे दुर्दैवी ! |