‘भारत ‘हिंदु राष्ट्र’च आहे’, असे म्हणणार्‍या आणि ख्रिस्ती असूनही हिंदु धर्माचा अभ्यास करणार्‍या मारिया वर्थ !

मारिया वर्थ या मूळच्या जर्मन लेखिका असून त्यांनी हॅम्बर्ग विद्यापिठातून मानसशास्त्र विषयात ‘पदव्युत्तर’ (जर्मन समकक्ष) शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या डेहराडून (उत्तराखंड) येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी जर्मन भाषेत २ आणि इंग्रजीत १ पुस्तक लिहिले असून त्यांचे आणखी एक इंग्रजी भाषेतील पुस्तक जुलै २०२५ मध्ये प्रकाशित होणार आहे. त्यांनी केलेल्या अनेक संकलनांमध्ये जर्मन मानसशास्त्र विद्यार्थ्यांसाठी ‘भगवद्गीते’वर आधारित एक अध्यायही समाविष्ट केला आहे. मारिया वर्थ यांचे जर्मन आणि इंग्रजी भाषांमध्ये १०० हून अधिक लेख विविध मासिके अन् संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहेत, ज्यामध्ये ‘हिंदुईझम टुडे’, ‘योगा ॲक्च्युअल’, ‘ऑपइंडिया’, ‘हिंदू पोस्ट’, ‘विश्व हिंदू’, ‘ऑर्गनायझर’, ‘लाईफ पॉझिटिव्ह’ इत्यादींचा समावेश आहे. यातील काही लेख हिंदी, मराठी, मल्याळम्, तमिळ आणि फ्रेंच भाषांमध्येही अनुवादित करण्यात आले आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वक्ता म्हणून सहभाग घेतला आहे, ज्यामध्ये वर्ष २०२३ मध्ये बँकॉकमधील ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चाही समावेश आहे.

मारिया वर्थ

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. मारिया वर्थ यांचा अल्प परिचय आणि त्यांची देवाविषयीची जिज्ञासा

मारिया वर्थ या दक्षिण जर्मनीतील एका कॅथॉलिक कुटुंबात वाढल्या. त्यांनी एका कॉन्व्हेंट बोर्डिंग शाळेत शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच त्यांना ख्रिस्ती देवाविषयी अनेक प्रश्न पडायला लागले. धर्मोपदेशक पाद्र्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्या हळूहळू ख्रिस्ती धर्मापासून दूर गेल्या. पुढे त्यांनी रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला जाणे बंद केले, ज्याला ख्रिस्ती धर्मात पाप समजले जाते. तोपर्यंत मारिया वर्थ ‘शाश्वत नरक’ या संकल्पनेच्या भीतीपासून मुक्त झाल्या होत्या. ते १९६० चे दशक होते, जेव्हा सर्वसाधारण वातावरण ख्रिस्तीविरोधी होते आणि ‘हिप्पी चळवळ’ चालू होण्याच्या मार्गावर होती.

मारिया वर्थ यांना स्वामी चिन्मयानंद यांचे दर्शन झाले तो क्षण

त्यानंतरही त्यांचे देवाविषयीचे प्रश्न अनुत्तरित राहिले. ‘देव खरच आहे का ?’, हे त्यांना निश्चितपणे जाणून घ्यायचे होते; पण त्यासाठी काय करावे, हे कळत नव्हते. एकदा भौतिकशास्त्राच्या वर्गात जेव्हा त्यांनी ऐकले की, ‘सगळी ऊर्जा एकच आहे’, तेव्हा त्यांना एक विचार सुचला, ‘जर देव असेल, तर तो हाच असावा’; पण तो विचार त्यांना पुष्कळच  अमूर्त वाटला !

याप्रसंगी मारिया वर्थ यांनी व्यक्त केलेले विचार जाणून घेण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

शालेय शिक्षणानंतर मारिया वर्थ यांनी ‘लुफ्तान्सा’ या नागरी विमान वाहतूक कंपनीमध्ये ‘इंटर्नशिप’ (कामाचा अनुभव मिळण्यासाठी ठराविक काळासाठी आस्थापनेमध्ये काम करणे) म्हणून काम चालू केले. तिथे त्यांना भरपूर प्रवास करण्याची संधी मिळाली, जी त्यांची लहानपणापासूनची इच्छाही होती. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी ‘ट्रान्सेडेंटल मेडिटेशन’ (अतींद्रिय ध्यान) या विषयाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्या प्रतिदिन ध्यान करू लागल्या; परंतु जेव्हा त्यांना अन्य माध्यमांतून कळले, ‘हे ध्यान केल्याने माणूस वेडा होऊ शकतो’, तेव्हा त्यांनी ध्यान करणे थांबवले. ४ वर्षांनी त्यांनी ‘लुफ्तान्सा’ आस्थापन सोडले आणि त्या हॅम्बर्ग विद्यापिठात मानसशास्त्राचे शिक्षण घेऊ लागल्या.

२. मारिया वर्थ यांना भारतात आल्यावर देवाविषयीच्या प्रश्नाचे उत्तर मिळणे

मारिया वर्थ डिसेंबर १९७९ मध्ये भारतात आल्या. ‘भारतात बहुदैवत्ववाद आहे’, असे शिकवले गेल्याने ‘येथे (भारतात) प्रश्नांची उत्तरे सापडतील’, अशी त्यांना अपेक्षा नव्हती; परंतु दैवयोगाने त्यांना भारतातील प्राचीन ज्ञान गवसले आणि त्या ज्ञानाची खोली पाहून मारिया वर्थ अचंबित झाल्या. त्यांना अनुत्तरित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली ! ऋषींनी जे ज्ञान दिले, तेच जणू त्यांना अंतःकरणातून जाणवत होते; पण त्यासाठी त्यांना शब्द सुचले नव्हते.

स्वामी विवेकानंद लिखित ‘ज्ञानयोग’ हे मारिया वर्थ यांच्या वाचनात आलेले पहिले पुस्तक होते. त्यानंतर मारिया वर्थ हरिद्वारच्या कुंभमेळ्यात पोचल्या. तेथे देवराहा बाबा आणि श्री आनंदमयी मां यांच्या सान्निध्यात त्यांना ऋषींच्या ज्ञानाचा खरा अर्थ समजला.

‘या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे अगदी आपल्या व्यक्तीमत्त्वाचेसुद्धा मूलतत्त्व एकच आहे, जे सदैव अस्तित्वात असणारे, निराकार आणि शाश्वत आहे. सर्व रूपे म्हणजे समुद्रावरच्या तात्पुरत्या लाटा आहेत, या लाटा त्यांच्या स्वरूपाला चिकटून रहातात आणि ते हरवण्याची भीती बाळगतात; पण शेवटी त्या सर्व लाटा, म्हणजे समुद्रच असतो अन् जेव्हा रूप नाहीसे होते, तेव्हा काहीही हरवत नाही, त्याचप्रमाणे आपण स्वतःला संपूर्ण विश्वापासून वेगळे समजतो, तसेच आपल्या क्षणभंगुर व्यक्तीमत्त्वाला चिकटून रहातो; पण स्वतःचे खरे अस्तित्व म्हणजे शुद्ध, आनंदमय जाणीव आहे अन् व्यक्तीमत्त्व हरवले, तरी आपली खरी ओळख हरवत नाही,’ अशा प्रकारे मारिया वर्थ यांचे चिंतन झाले. यामुळे त्यांना जीवनाचा खरा हेतूसुद्धा स्पष्ट झाला तो, म्हणजे ‘मी खरोखर कोण आहे?’ याचा शोध !

हिंदु धर्माची महानता आणि साधनेची आवश्यकता !

हिंदूंनी आपल्या ऋषींनी शोधून काढलेल्या मूलभूत तत्त्वांना समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार जगणे आवश्यक आहे. सध्या विशेषतः तरुण पिढीमध्ये हे अल्पच दिसून येते. त्यांना हेही ठाऊक नाही की, हिंदूंच्या परंपरा इतर अंधश्रद्धा आधारित धर्मव्यवस्थांपेक्षा श्रेष्ठ आहेत; कारण हिंदु धर्म हा ज्ञानाच्या शोधावर आधारलेला आहे, अंधश्रद्धेवर नव्हे. तो विज्ञानाला विरोध करत नाही, उलट विज्ञानाला प्रेरणा देणारा आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’चा समावेश झाल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा आहे; मात्र हे यशस्वी होण्यासाठी साधना आवश्यक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनीही साधना करायला हवी. जर शाळांमध्ये प्रतिदिन १५ मिनिटे शांत ध्यान केले, तर ते पुष्कळ उपयोगी ठरेल.

– मारिया वर्थ

मारिया वर्थ यांना सत्य साईबाबा यांचे दर्शन झाले तो क्षण

३. मारिया वर्थ यांनी घेतलेल्या विविध आध्यात्मिक गुरूंच्या भेटी !

प्रारंभीच्या २० वर्षांत मारिया वर्थ एक साधे जीवन जगल्या, त्या प्रामुख्याने आश्रमांमध्ये राहिल्या आणि त्यांनी अनेक गुरूंच्या भेटी घेतल्या. त्या सर्वांमध्ये ‘ओशो’, ‘सत्य साईबाबा’, ‘स्वामी चिन्मयानंद’, ‘हैदाखान बाबाजी’ आणि सर्वश्रुत नसलेल्या बर्‍याच गुरूंनाही त्या भेटल्या. नंतरच्या काळात त्यांची भेट ‘अम्मा’, ‘श्री श्री रविशंकर’ आणि ‘योगगुरु स्वामी रामदेव’ यांच्याशी झाली.

४. भारतीय इतिहास जाणून घेण्यामागील कारण

‘देवाचे अस्तित्व आहे, तोच सर्वांचा निर्माता आहे, सर्वव्यापी आहे’, या ज्ञानप्राप्तीमुळे मारिया वर्थ यांना पुष्कळच आनंद मिळाला. पाश्चात्त्य देशांमध्ये या ज्ञानाविषयी काहीही माहिती नसल्याने त्यांनी हे ज्ञान त्या ठिकाणी पोचवण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी यावर जर्मन मासिकांसाठी लेख लिहायला प्रारंभ केला.

वर्ष २००२ मध्ये मारिया वर्थ डेहराडूनला रहायला गेल्या. तिथे त्यांच्या मित्र परिवारात उच्च शिक्षित मंडळी होती; परंतु आश्चर्य म्हणजे ते हिंदु धर्मावर टीका करायचे. तेव्हाच मारिया वर्थ यांनी भारतीय इतिहास जाणून घेण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, विशेषतः ‘शिक्षित’ भारतीय त्यांच्या परंपरेवर का टीका करतात ? इंग्रजांनी भारतियांना अशा प्रकारचे शिक्षण दिले की, त्यांनी ब्रिटनकडे आदराने पहावे आणि भारताकडे तुच्छतेने !

कालांतराने मारिया यांनी हिंदु धर्माचा ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्याशी तुलनात्मक अभ्यास चालू केला आणि मुख्यतः इंग्रजीमध्ये लेखन चालू केले. त्याकाळी विविध धर्मांची तुलना करणे, हे हिंदूंमध्ये निषिद्ध मानले जायचे. ‘आक्रमकांचे धर्म म्हणजे केवळ एक अंधश्रद्धा असलेली आणि समाजात फूट पाडणारी तत्त्वे आहेत’, हे सत्य सांगायचीही भीती हिंदूंना वाटायची’, याचे मारिया यांना वाईट वाटत असे. सुदैवाने परिस्थिती पालटत गेली.

उत्तराखंडमधील गोमुख येथे दर्शन घेतल्यानंतर मारिया वर्थ

अन्य धर्मीय मानवजातीला दोन भागांत विभागतात, जे बरोबर आहेत ते आणि जे चुकले आहेत (आणि जे नरकात जातात) हे सगळे एका व्यक्तीच्या म्हणण्यावर आधारित असते.  याउलट हिंदु धर्म खरोखरच सर्वसमावेशक आणि वैश्विक आहे. येथे परमेश्वर इब्राहिमिक धर्मांमध्ये दिसतो तसा एखाद्या वेगळ्या वा सूड घेणार्‍या सत्तेसारखा नसतो. हिंदूंना त्यांची बुद्धी वापरून अंतःकरणाचे ऐकण्याचे प्रोत्साहन दिले जाते. ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांमध्ये धर्मांतर केलेल्या लोकांना (केवळ भारतातीलच नव्हे, तर सर्वत्रचे ख्रिस्ती आणि मुसलमान मूळचे धर्मांतरितच आहेत !) स्वतः विचार करण्यास प्रवृत्त केले जात नाही.

अशा पद्धतीचे विचार आणि लिखाण यांमुळे मारिया यांच्याशी जोडला गेलेला ‘धर्मनिरपेक्ष’ मित्र परिवार मात्र समाधानी नव्हता आणि ते मारिया यांना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक प्रचारक’, असे संबोधू लागले. एकूणच या मंडळींवर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा प्रभाव स्पष्ट होता. त्यामुळे मारिया यांनी कालांतराने त्या मंडळींपासून स्वतःला दूर केले. पुढे लिखाणाला पसंती देणार्‍या अनेक नव्या व्यक्तींचा संपर्क त्यांना मिळाला.

५. ‘डीप स्टेट’ आणि भारताला हानी पोचवणार्‍या शक्ती यांच्याविषयी…

समाजात अराजक माजवू इच्छिणार्‍या शक्ती, म्हणजेच तथाकथित ‘डीप स्टेट’ ! (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे.) यांच्याकडे अशांतता पसरवण्यासाठी अमर्यादित पैसा आहे. जर सरकारने अल्पसंख्यांक धर्मियांच्या विशेष सवलती काढल्या, तर अशा शक्तींना भारताला हानी पोचवण्याची संधी मिळू शकते. विशेषतः मुसलमान समाजाने हे समजून घेतले पाहिजे की, त्यांचा वापर रस्त्यावर गदारोळ करण्यासाठी केला जातो. ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हल्पमेंट’च्या (‘यू.एस्.ए.आय.डी’च्या) निधीचे जे खुलासे झाले, त्यात अनेक मुसलमान संघटनांचा समावेश होता, हे खरेच डोळे उघडणारे होते.

Maria Wirth: “Christians & Muslims who deride Hindus must realise that their ancestry is Hindu.”
(मारिया विर्थ: “हिंदूंचा उपहास करणाऱ्या ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांचे पूर्वज हिंदू आहेत.”)

(सौजन्य : The Festival of Bharat)

६. बौद्धिक लढ्याच्या विरोधात हिंदूंनी करावयाचे प्रयत्न

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतियांनी हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे की, माणसांना बौद्धिकदृष्ट्या दुर्बल करण्यासाठी काही खोडसाळ प्रयत्न चालू आहेत. काही शक्ती ज्या माणसांना कृत्रिम बुद्धीमत्तेशी जोडण्याचे नियोजन करत आहेत, त्या आधी आपल्याला ‘जंक फूड्स’, ‘गेम्स’ आणि याहूनही वाईट म्हणजे अश्लीलता अन् अमली पदार्थ यांच्या व्यसनात अडकवू पहात आहेत. या सगळ्याचा हेतू असा आहे की, आपल्याला आतल्या शक्तीपासून तोडून टाकावे. हिंदु धर्मामध्ये स्वतःतील अंतर्गत शक्तींशी जोडले जाण्याविषयी स्पष्ट मार्गदर्शन आहे आणि हेच त्या शक्तींना धोका वाटते; कारण जो माणूस स्वतःच्या आत्मशक्तीशी जोडलेला असतो, त्याला सहज नियंत्रित करता येत नाही.

आपल्या विरोधकांची आर्थिक शक्ती अक्षरशः अमर्याद आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण यंत्रणेला केवळ आर्थिक स्तरावर लढा देणे कठीण आहे; मात्र आपल्या बाजूला सत्य आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत कोणत्याही शक्य माध्यमातून लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत. पश्चिमी मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि अगदी समाजमाध्यमेही हिंदु धर्म अन् हिंदूंविषयी अपप्रचार करत आहेत. तरीही ‘प्राच्यम्’, ‘क्युरियस प्लस’ यांसारख्या काही प्लॅटफॉर्म्स उत्कृष्ट आणि लहान व्हिडिओ सिद्ध करत आहेत, जे हिंदु धर्माचे सकारात्मक दर्शन घडवतात. याखेरीज माझ्या ‘ब्लॉग’सह अनेक ठिकाणी लेखसुद्धा प्रकाशित होत आहेत, जे लोकांच्या मनात हिंदु धर्माविषयी स्पष्टता निर्माण करत आहेत. हे व्हिडिओ आणि लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत, शक्य असेल तर शाळांपर्यंतही. सध्या मात्र या गोष्टींचा प्रसार वाढवण्यासाठी फारसे साहाय्य किंवा पाठिंबा मिळत नाही, हीच एक मोठी अडचण आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’च !

माझ्या दृष्टीने भारत हे एक ‘हिंदु राष्ट्र’ आहे; कारण इथे बहुसंख्य लोक हिंदू आहेत. भारताला हिंदु राष्ट्र म्हटल्यावर काही भारतीय अस्वस्थ का होतात ?, हे मला कधीच समजले नाही. हेच लोक जर्मनीला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ किंवा पाकिस्तानला ‘इस्लामी राष्ट्र’ म्हटल्यावर मात्र काहीच म्हणत नाहीत. आज जर्मनीमध्ये फक्त ४९ टक्के लोक ख्रिस्ती आहेत, तरीही जर्मनीला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ म्हणून ओळखले जाते. यावर कुणी आक्षेप घेत नाही. अधिकृतरित्या जर्मनी भारतासारखाच ‘धर्मनिरपेक्ष’ आहे. एखाद्या देशाची अधिकृत धार्मिक ओळख असण्याचे कायदेशीर लाभ काय असतात, हे मला ठाऊक नाही; मात्र माझ्या मते सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक दिली जावी’, हे स्वातंत्र्यानंतर भारतात झालेले नाही. त्यामुळे भारत खराखुरा ‘धर्मनिरपेक्ष’ देश नाही. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा असतो, ‘राज्य आणि केंद्र सरकार नागरिकांच्या धर्माप्रती पूर्णतः निष्पक्ष असायला हवे.’ माझी इच्छा आहे की, भारताने सर्वांना समान वागणूक द्यावी.

– मारिया वर्थ

७. सध्या चालू आहे आध्यात्मिक युद्ध !

मारिया वर्थ यांची भावना अशी आहे की, आपण सध्या एक आध्यात्मिक युद्ध लढत आहोत. अगदी पुराण कथांमध्ये जसे देव आणि अहंकारी असुरांमध्ये संग्राम झाला होता तसाच ! आज आसुरी प्रवृत्ती पाश्चिमात्य जगतात अधिक बळकट वाटतात, जिथे सैतानाच्या पूजेसारख्या गोष्टींनाही धर्माचा दर्जा दिला जातो आणि इथे भारतात आजही देवतांची पूजा केली जाते. काही भारतीयही स्वतःचा स्वार्थ सर्वकाही मानतात; पण त्यांचे प्रमाण थोडे आहे. फार थोडे लोक सत्ता आणि संपत्ती यांच्या बदल्यात स्वतःचा अंतरात्मा विकायला सिद्ध होतील. हिंदूंमध्ये अजूनही धार्मिक आचरण, धर्माचे बीज खोलवर रुजलेले आहे आणि कदाचित् हीच ती कारणे आहेत, ज्यामुळे हिंदु धर्म अन् हिंदू लोकांवर इतके तीव्र आक्रमणे केली जात आहेत. धर्म आपल्याला मजबूत बनवतो आणि एकदा माणूस आंतरिकदृष्ट्या मजबूत झाला की, त्याला सहज नियंत्रित करता येत नाही.