रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्याची महती !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहाणार्‍या जिज्ञासूंना आश्रम दाखवणार्‍या साधकाचा चेहरा ३ घंट्यांनंतरही उत्साही जाणवणे 

‘२४.२.२०२५ या दिवशी दुपारी ४.१५ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून झाल्यानंतर कोल्हापूर येथील सौ. भाग्यश्री सुरेश पोरे यांनी मला सांगितले, ‘‘दादा, तुम्ही आम्हाला आश्रम दाखवत असतांना आरंभी तुमच्या चेहर्‍याकडे पाहून जसे उत्साही वाटत होते, अगदी तसेच आता ३ घंटे आश्रम पाहून झाल्यावर तुमच्या चेहर्‍याकडे पाहून उत्साही वाटत आहे, म्हणजे जणू काही तुम्ही आताच आम्हाला आश्रमाची माहिती सांगण्यास आरंभ करत आहात.’’ तेव्हा गुरुकृपेने माझ्याकडून बोलले गेले, ‘‘सनातन आश्रमाचे हेच वैशिष्ट्य आहे. आश्रमातील चैतन्यामुळेच अशी अनुभूती येते.’’

श्री. गिरिधर वझे

तत्क्षणी गुरुकृपेने आम्ही (मी आणि सौ. पोरे यांनी) स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राच्या समोरील पांढर्‍या रंगाच्या जास्वंदीचे फूल पाहिले आणि आम्हाला ते फूल श्रीकृष्णाच्या चरणी नुकतेच वाहिल्याप्रमाणे प्रफुल्लित (टवटवीत) दिसले. त्या माध्यमातून जिज्ञासूंना आश्रमातील चैतन्याचे प्रत्यक्ष प्रमाण अनुभवता आले.

‘आश्रमाच्या स्वागतकक्षातील भगवान श्रीकृष्णाच्या चित्राला सकाळी पूजेच्या वेळी वाहण्यात आलेले फूल सायंकाळी ७.३० वाजताही प्रफुल्लित दिसणे’, हेसुद्धा विशेषच आहे; कारण जास्वंदीची कोमल फुले उन्हाळ्यात दुपारी १२ वाजेपर्यंत कोमेजतात. आश्रमातील चैतन्यमय वातावरणामुळे सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र आपोआप त्रिमितीय झाले आहे. (चित्रातील श्रीकृष्णाचे डोळे, त्याचे ओठ आणि त्याच्या हातातील सुदर्शनचक्र यांत जिवंतपणा जाणवतो.) त्यामुळे त्या श्रीकृष्णाच्या चित्राला वाहिलेली जास्वंदीची पांढर्‍या रंगाची कोमल फुले सायंकाळी ७.३० वाजताही कोमेजली नव्हती, तर ती फुले सकाळप्रमाणेच पूर्ण फुललेल्या स्थितीत राहिली.

२. रामनाथी आश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सौ. पोरे म्हणाल्या, ‘‘आम्ही ३ घंटे चालत आश्रम पाहूनही आम्हाला उत्साही वाटत आहे.’’ 

३. रामनाथी आश्रमातील चैतन्याची साधक आणि जिज्ञासू यांना येत असलेली प्रचीती  

या अनुभूतींतून सध्याच्या काळानुसार ‘सनातन आश्रमातील चैतन्यच जिज्ञासूंना कृतीशील कसे बनवते !’, ते लक्षात येते. ‘आश्रमातील चैतन्यामुळे थकवा न जाणवता उत्साह टिकून रहातो’, ही अनुभूती माझ्यासह अनेक साधक बर्‍याच वेळा घेत असतात; मात्र त्यासंदर्भात जिज्ञासूने निरीक्षण करून साधकाला जाणवलेल्या सूत्राविषयी स्वतःहून सांगणे, यातून सौ. पोरे यांच्यातील उत्तम निरीक्षणक्षमता आणि शिकण्याची वृत्ती लक्षात आली.’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२५)

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर कोल्हापूर येथील सौ. भाग्यश्री सुरेश पोरे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘मला देवदेवतांची आवड आहे. मी घरी असतांनाही माझा मनात ‘स्वामी समर्थां’चा नामजप चालूच असतो. आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वागतकक्षात येताच आम्हाला पुष्कळ प्रसन्न वाटले. त्याच वेळी मला वाटले, ‘संपूर्ण आश्रम पाहिल्यावर आम्हाला पुष्कळ शिकायला मिळेल, नामजपाविषयी ऐकायला मिळेल आणि नामजप करता येऊ शकेल !’

सौ. भाग्यश्री पोरे

मला मणक्याचा त्रास असूनही मी आश्रम पहाण्याच्या निमित्ताने प्रथमच ३ घंटे चालले, तरीही माझा उत्साह टिकून होता. टप्प्याटप्प्याने आश्रम पहातांना आमचा उत्साह वाढतच गेला.

आम्हाला संपूर्ण आश्रम दाखवणार्‍या साधकाच्या चेहर्‍यावरचे तेजही पाहिले, तेच ते तेज आरंभापासून शेवटपर्यंत होते. तेही आम्हाला आवडले. आम्हाला आश्रमाची माहिती सांगत असलेल्या साधकाचा तेजस्वी चेहरा पाहून त्या साधकाचे बोलणे ऐकतांना त्याचा उत्साह टिकून असल्याचे आमच्या लक्षात आले. मला त्या साधकामध्ये श्रीकृष्णाचा अंशही जाणवला.

आम्ही आश्रम पाहून झाल्यानंतर आम्हाला शरिरात चांगली ऊर्जा आल्याप्रमाणे जाणवले. आम्ही ध्वनीचित्रीकरण कक्षात बसलो असतांना आम्हाला स्वतःमध्ये चांगल्या लहरी आल्यासारखे जाणवले. आपल्या देवदेवतांच्या हातांमधून चैतन्य प्रक्षेपित होते, तसेच चैतन्य मला आश्रमात जाणवले. नंतर आम्ही आश्रमातून मडगाव येथील मुलीच्या घरी गेल्यानंतरही मला कंटाळा आला नाही किंवा थकवा जाणवला नाही. (केवळ माझे पाय जरासे दुखले.) मी घरी गेल्यावरही मला पुष्कळ चांगले वाटले. मी मुलीला सांगितले, ‘‘आश्रम एकदम छान आहे. तू गोव्यात आहेस, तर दोन दिवस तिथे जाऊन ये. त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.’’

आश्रमात पुष्कळ चैतन्य साठलेले आहे. ते आम्हालाही जाणवले. आम्हाला प्रसन्न वाटले. तेथे चांगला सुगंधही येतो.’

– सौ. भाग्यश्री सुरेश पोरे, मंगळवार पेठ, कोल्हापूर. (५.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक