शिवमोग्गा, कर्नाटक येथील श्री. सोमशेखर एम्.बी. यांनी सत्संगात साधनेविषयी विचारलेले प्रश्न आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

१. कर्तेपणा इतरांना देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
मी : पूर्वी एखादा प्रश्न पडल्यास तुम्हाला प्रार्थना केल्यावर लगेच दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा साधकांच्या माध्यमातून मला उत्तर मिळायचे. ‘एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तुम्ही आई-वडिलांची किती काळजी घेतलीत !’, याविषयीचे लिखाण छापून आले होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मी कुठे काळजी घेतली ? सत्यवानने (सद्गुरु सत्यवान कदम यांनी) काळजी घेतली.

२. ‘वडिलांची सेवा नामजपासह केल्याने साधकाची साधना झाली’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
मी : त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘मी तर आता पूर्णवेळ सेवा करतो. प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या आई-वडिलांची सेवा केली, तशी मला माझ्या आई-वडिलांची सेवा करायला मिळेल कि नाही ?’ त्यानंतर १५ दिवसांत ‘वडिलांची प्रकृती बरी नाही. लगेच घरी ये’, असा भ्रमणभाष आला. मला दीड वर्ष वडिलांची सेवा करता आली. ते तुमच्या कृपेनेच घडले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘दीड वर्ष सेवा करता आली’, हे चांगले आहे; परंतु ती नामजप करत केली कि कशी केली ?
मी : मी नामजपासह वडिलांची सेवा केली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे चांगले आहे. ही साधना झाली.
३. वडिलांनी शेवटच्या २ दिवसांत भ्रमणभाषवर श्लोक किंवा नामजप लावून ठेवण्यास सांगणे आणि त्यांना उपायांसाठी दिलेला नामजप त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत करणे
मी : पूर्वी वडील साधनेला विरोध करत होते. त्यांना रुग्णालयात भरती केल्यावर मी नामजप किंवा श्लोक भ्रमणभाषवर लावून ठेवत होतो. ‘अल्पाहार किंवा औषध आणायला बाहेर जातांना भ्रमणभाष घेऊन जा’, असे ते मला सांगायचे; परंतु त्यांच्या शेवटच्या २ दिवसांत त्यांनी मला सांगितले, ‘‘भ्रमणभाषवर माझ्या जवळ श्लोक किंवा नामजप लावून ठेव.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी वडिलांना आणि मलाही नामजप करायला सांगितला होता. दोघांचा मिळून ११ घंटे नामजप करावा लागायचा. वडिलांच्या शेवटच्या २ दिवसांत तर मला न झोपता नामजप करावा लागला. ‘तुम्हाला उपायांसाठी दिलेला नामजप तुम्ही कराल का ?’, असे मी वडिलांना विचारले. तेव्हा वडील नामजप करायला सिद्ध झाले आणि तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी नामजप केला.
४. साधकाकडून ‘आईला त्रास होण्यापेक्षा तिला तुमच्या चरणी स्थान द्या’, अशी प्रार्थना होणे
मी : आईच्या निधनाच्या २ – ३ दिवस आधी माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेव, सध्या आपत्काळ चालू आहे. मला साधना करायची आहे. धर्मकार्यात सहभागी व्हायचे आहे. आपत्काळाच्या परिस्थितीत आईला अशा प्रकारचे त्रास होण्यापेक्षा तिला तुमच्या चरणी स्थान द्या.’
५. ‘वैयक्तिक कारणासाठी प्रार्थना न करणे’, हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
मी : गुरुदेव, मी माझ्यासाठी प्रार्थना कधीच केली नाही. माझ्याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रार्थना झाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे पुष्कळ चांगले आहे. ‘वैयक्तिक प्रार्थना न करणे’, हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे.
६. साधक परात्पर गुरु डॉक्टर आणि देवता यांना करत असलेली प्रार्थना !
मी : प.पू. गुरुदेव, कुलदेवता आणि श्रीकृष्ण यांना किंवा कोणत्याही देवळात गेल्यावर माझ्याकडून प्रार्थना होते, ‘हे भगवंता, (ज्या देवाला प्रार्थना करतो, त्या देवाला उद्देशून) तिसर्या महायुद्धाच्या काळात आम्हा सर्व साधकांचे रक्षण होऊ दे. प.पू. गुरुदेवांच्या राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, तसेच अध्यात्मप्रसाराच्या कार्यात तन, मन, धन आणि सर्वस्व अर्पण करून साधना अन् सेवा करण्याची मनःस्थिती आणि बुद्धी देऊन तुम्हीच माझे रक्षण करा. माझे मन आणि बुद्धी सदैव तुमच्या चरणी दास रूपात ठेवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
परात्पर गुरु डॉ. आठवले : वा ! प्रार्थना पुष्कळ चांगली आहे.
७. आई आजारी असतांना घरी जातांना मारुतीचा आणि त्यानंतर दत्ताचा नामजप आपोआप चालू होणे अन् वाटेत असतांनाच आईचा मृत्यू झाल्याचे बहिणीने घरी गेल्यावर सांगणे
मी : एरव्ही मला एक सेवा करायला २ दिवस लागायचे; परंतु या वेळी सेवा पूर्ण करायला ७ – ८ घंटे लागले. सेवा रात्री १.३० वाजता संपली आणि त्याच वेळी घरून माझ्या मोठ्या बहिणीचा भ्रमणभाष आला. तिने सांगितले, ‘‘आईची प्रकृती गंभीर आहे. लवकर ये.’’ मी लगेच घरी जायला निघालो. त्या वेळी माझा मारुतीचा नामजप आपोआप चालू झाला. अर्ध्या वाटेत असतांना बहिणीचा भ्रमणभाष आला. त्यानंतर माझा दत्ताचा नामजप आपोआप चालू झाला. ‘असे का होत आहे ?’, असा विचार माझ्या मनात आला. मी वाटेत असतांनाच आई वारली, असे मी घरी पोचल्यावर बहिणीने मला सांगितले. तुमच्या कृपेने २७ कि.मी.चा प्रवास ३० मिनिटांत करून मी घरी पोचलो.
८. आई-वडिलांच्या निधनानंतर ‘हृदयाचे ठोके थांबल्यावर प्रथमोपचारात सांगितलेले उपाय करावेत’, असे न वाटण्यामागील साधकाचा आध्यात्मिक दृष्टीकोन आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याचे केलेले कौतुक !
मी : गुरुदेव, आई-बाबा दोघेही गेल्यावर ‘तेथे प्रत्यक्ष उपस्थित असूनही हृदयाचे ठोके थांबल्यावर प्रथमोपचारात सांगितलेले उपाय करावेत’, असे मला वाटले नाही. ‘असे का झाले ?’, असा प्रश्न पडल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘जेव्हा एखाद्या व्यक्तीचा देवाण-घेवाण हिशोब संपून प्रारब्ध नष्ट होते, तेव्हा त्याचा मृत्यू चुकवता येत नाही. त्या वेळी आपण शिकलेली कोणतीही विद्या आपल्याला आठवत नसते.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : हा पुष्कळ चांगला विचार आहे. किती चांगले प्रयत्न आहेत ! अशी साधना झाल्यास लवकर आध्यात्मिक प्रगती होईल !’
– श्री. सोमशेखर एम्.बी., शिवमोग्गा, कर्नाटक.