मुंबई, २२ एप्रिल (वार्ता.) – ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे ‘राज्यगीत’ म्हणून शासनाने घोषित केले आहे. राष्ट्रगीतानंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे गीत सन्मानपूर्वक गायले जावे, असा आदेश शासनाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी २२ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी दादाजी भुसे म्हणाले,
१. येत्या काळात ‘पीएम्श्री’ या धर्तीवर राज्यात ‘सीएम्श्री’ केंद्रपातळीवर एक आदर्श शाळा विकसित केली जाईल. यामध्ये १०० पट असलेल्या शाळांचा समावेश असेल. उर्वरित शाळांमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक एक ‘स्मार्ट वर्ग’ म्हणून निवडला जाणार आहे.
२. यापूर्वी इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना ३ वर्षे शिष्यवृत्ती दिली जात होती. यापुढे गुणवत्ता सूचीत आलेल्या विद्यार्थ्यांनाही लाभ दिला जाईल.
३. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, शाळांमध्ये विविध सुविधा येण्यासाठी समर्पित भावाने काम करणार्या शिक्षकांना शासनाकडून गौरवण्यात येईल.