उड्डाणपुलाऐवजी बगलमार्गाच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम

फोंडा, २२ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून २२ एप्रिल या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि अभियंते यांनी भोम येथे उड्डाणपूल कुठून जाणार ? आणि कसा जाणार ? यासंबंधीचे मोजमाप करण्यास प्रारंभ केला. ग्रामस्थांनी याला तीव्र आक्षेप घेऊन ‘आम्हाला उड्डाणपूल नको, तर बगलमार्गच हवा’, अशी मागणी केली. या वेळी संपूर्ण भोम गावात तणावपूर्ण वातावरण होते. अधिकार्यांनी या वेळी पोलीस बंदोबस्तात मोजणीचे काम उरकून घेतले.
भोम गावात ६ पदरी रस्ता होणार आहे. यासाठी येथे उड्डाणपूल उभारला जाणार आहे; मात्र ग्रामस्थांचा याला प्रारंभापासून विरोध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘२२ एप्रिल या दिवशी बांधकाम खात्याचे अधिकारी उड्डाणपुलाविषयी ग्रामस्थांना माहिती देणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी ग्रामस्थांची भेट घेणार’, असे भोमवासियांना सांगितले होते. यानुसार २२ एप्रिल या दिवशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्री सातेरी मंदिराजवळ जमा झाले होते आणि बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी मोजमाप करण्यास प्रारंभ केल्यावर ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
बांधकाम खात्याचे अधिकारी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते; मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. याच स्थितीत अधिकार्यांनी रेखांकन आणि मोजमाप चालूच ठेवले. प्रत्यक्ष संपूर्ण मोजणी झाल्यानंतर अभियंते ग्रामस्थांना सर्व माहिती देणार होते; मात्र ग्रामस्थांनी बगलमार्गाचा हट्ट धरला. ग्रामस्थांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संमत केलेला आराखडा ग्रामस्थांना दाखवण्याचा आग्रह धरला; मात्र तो दाखवण्यास अधिकारी असमर्थ ठरले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भोमवासियांशी चर्चा करून त्यांचा प्रश्न सोडवण्यास सिद्ध असल्याचे म्हटले आहे.