Number Of Churches Doubled : झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्‍यांतील चर्चच्‍या संख्‍येत दुपटीने झाली वाढ !

  • आदिवासींच्‍या भूमींवर उभारले जात आहेत चर्च

  • धर्मांतरामुळे छत्तीसगडमधील अनेक गावे झालीत ख्रिस्‍तीबहुल

रांची (झारखंड) – देशातील झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या ४ राज्‍यांत गेल्‍या १० वर्षांत चर्चची संख्‍या जवळपास दुप्‍पट झाली. एका सर्वेक्षणानुसार वर्ष २०११-१२ मध्‍ये या राज्‍यांमध्‍ये १२ सहस्र ३०० चर्च होते, ते आता २५ सहस्रांहून अधिक झाली आहेत, असे वृत्त दैनिक ‘दिव्‍य मराठी’ने दिले आहे. झारखंडमधील गुमला जिल्‍ह्यातील अनेक गावांत ९० लोक ख्रिस्‍ती झाली आहेत. ते आता त्‍यांच्‍या घराबाहेर क्रॉसचे चिन्‍ह लावतात.

आदिवासींच्‍या भूमींवर बेकायदेशीरित्‍या बांधली जात आहेत चर्च !

बेकायदेशीर धर्मांतर आणि चर्च यांच्‍या विरोधात कायदेशीर लढा लढणारे सरकारी अधिवक्‍ता राम प्रकाश पांडे यांनी सांगितले की, आदिवासींचे धर्मांतर करून त्‍यांच्‍या भूमींवर अतिक्रमण केले जात आहे. मग इथे चर्च, शाळा, रुग्‍णालये बांधली जात आहेत. नियमानुसार एखादा आदिवासी दुसर्‍या आदिवासीलाच भूमी देऊ शकतो; मात्र आदिवासीबहुल गावांमध्‍ये बांधलेली सर्व चर्च आदिवासींच्‍या भूमीवर आहेत.

जशपूर (छत्तीसगड) येथे न्‍यायालयाच्‍या आदेशानंतरही अतिक्रमणांवर कारवाई नाही !

जशपूर (छत्तीसगड) जिल्‍ह्यात वर्ष २००७ मध्‍ये आदिवासींच्‍या भूमींवर चर्च बांधण्‍यात आल्‍याची २५० प्रकरणे न्‍यायालयात प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली होती. न्‍यायालयाने सर्व भूमी अतिक्रमणमुक्‍त करण्‍याचे आदेश दिले. वर्ष २००९ मध्‍ये तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी अतिक्रमण मुक्‍तीसाठी बडा करोडा येथे गेले असता त्‍यांना चर्चमध्‍ये ओलीस ठेवण्‍यात आले होते. त्‍यानंतर आजतागायत या भूमींवरील अतिक्रमण कुणीही हटवू शकलेले नाही. वर्ष २००७ ते २०२४ या कालावधीत ११६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. या सर्वांच्‍याच भूमीवर चर्च बांधण्‍याच्‍या आणि त्‍या कह्यात घेण्‍याच्‍या तक्रारी आहेत.

छत्तीसगडमध्‍ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर

छत्तीसगडमधील सन्‍ना ब्‍लॉकमध्‍ये ५० गावे आहेत. तेथील केवळ ५ गावांमध्‍ये अद्याप कुणीही ख्रिस्‍ती झालेले नाहीत. सराईटोली गावात १०० हून अधिक घरे ख्रिस्‍त्‍यांची आहेत. आता तेथे केवळ हिंदूंचे एकच घर उरले आहे. पारसपूरमध्‍येही हिंदूंची केवळ तीनच घरे आहेत. त्‍याचप्रमाणे करडीहमध्‍ये ९० टक्‍के ख्रिस्‍ती झाले आहेत. जशपूरमध्‍ये एक चर्च होते, आता ५० आहेत. विशेष म्‍हणजे या हिंदूंचे धर्मांतर केल्‍यानंतर त्‍यांची नावे पालटली जात नाहीत. त्‍यामुळे ते नावावरून ख्रिस्‍ती म्‍हणून ओळखले जात नाहीत.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा आणि या हिंदूंचे आणि आदिवासींचे रक्षण करावे अन्‍यथा या राज्‍यांतून हिंदू पुढे नावालाही शिल्लक रहाणार नाहीत !