जगात अराजक माजवून विद्ध्वंस घडवण्याचे साम्यवादी आणि जिहादी यांचे षड्यंत्र ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

कार्मक्रमाला उपस्थित शेकडो हिंदु धर्मप्रेमी

पुणे – जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’, साम्यवादी, तसेच ‘सेमिटिक धर्म’ (मध्यपूर्वेत उदयाला आलेले धर्म) असलेले ख्रिस्ती चर्च आणि जिहादी इस्लाम ! आपली ओळख आणि आत्मसन्मान जपणारी, तसेच देशहिताची स्वतंत्र धोरणे आखणारी राष्ट्रे त्यांच्या डोळ्यांत खुपतात. या देशांमध्ये अराजक आणि हिंसाचार यांचे थैमान घालून विद्ध्वंस घडवून आणण्यासाठी या शक्ती प्रयत्नशील असतात. याचा प्रयोग नुकताच बांगलादेशामध्ये यशस्वी करण्यात आला आणि भारतातही तेच चालू आहे, असे गंभीर वक्तव्य ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे लेखक अन् साम्यवादाचे सखोल संशोधक श्री. अभिजित जोग यांनी केले.

श्री. अभिजित जोग

ते सनातन संस्था आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा शहरी नक्षलवाद’ या विषयावर येथील टिळकवाडा परिसरात असलेल्या ‘लोकमान्य सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमाला संबोधित करत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस अन् शहरी नक्षलवादी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे रचली जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर-कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांनी षड्यंत्र आखले होते. यांच्याकडून सनातन संस्थेला दोषी ठरवून ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरी नक्षलवादाशी जोडलेल्या डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश या ४ हत्या झाल्यावर देशातील साम्यवादी विचारांच्या मान्यवरांनी ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेपासून ते भारतात रहाण्याची भीती वाटू लागल्याची ओरड चालू केली होती. म. गांधींच्या हत्येनंतर देशात याच ४ हत्या झाल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; मात्र भारतात मागील २५ वर्षांत नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक सैनिक, पोलीस, राजकीय नेते, तसेच सामान्य नागरिक यांच्या ज्या हत्या केल्या आहेत, देशभरात कमलेश तिवारी, किशन भरवाड, प्रवीण नेट्टारू, प्रशांत पुजारी यांच्यासारख्या सहस्रो हिंदुत्ववाद्यांच्या ज्या हत्या करण्यात आल्या, त्यांच्या संदर्भात कधीही चर्चा केली जात नाही.

डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता केली. डॉ. तावडे यांना या प्रकरणात ८ वर्षे कारागृहवास भोगावा लागला. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. डॉ. तावडे यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ठोस पुरावे सादर करू शकली नाही. त्यानंतरही डॉ. तावडे यांना जामीन न मिळणे, हा अन्यायच आहे. श्री. विक्रम भावे यांना २ वर्षे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ४२ दिवस कारागृहात रहावे लागले. या तिघांची झालेली व्यक्तीगत हानी कोण भरून देणार ?, असा महत्त्वपूर्ण प्रश्‍न श्री. चेतन राजहंस यांनी उपस्थित केला.