सर्व आजारांपासून दूर रहाण्यासाठी जेवण्याचे आणि पाणी पिण्याचे नियम !

योगासनांसमवेत योग्य प्रमाणात (योग्य वेळी) आहार घेणे आणि पाणी पिणे आवश्यक आहे. असे केले, तर कितीतरी आजार आपल्या आयुष्यात येण्यापासून टाळले जातात.

१. जेवणाआधी ३५ मिनिटे पाणी पिऊ नये आणि जेवणानंतर ३५ मिनिटे पाणी पिऊ नये.

२. जेवतांना पाणी पिणे टाळावे. आवश्यकता असेल तर १,२ घोट आवश्यकतेप्रमाणे पिऊ शकतो.

३. पाणी पितांना अत्यंत सावकाश, हळूवारपणे एकेक घोट घेत पाणी प्यावे.

४. जेवतांना प्रत्येक घास चावून खावा; कारण जेवढे चावून खाऊ तेवढेच अन्न पचते; कारण पोटात दात नाहीत.

५. जेवतांना गप्पा मारत किंवा भ्रमणभाषवर बोलत जेवू नये. बोलतांना घास न चावताच गिळला जातो. त्यामुळे ते पचत नाही. त्यामुळे जेवणातील प्रथिने, जीवनसत्व मिळत नाहीत. यामुळे वात वाढतो, तसेच बद्धकोष्ठता होते.

६. जेवणानंतर लगेच झोपू नये, तर वज्रासनात २० मिनिटे बसावे म्हणजे अन्न पचते. ४५ मिनिटाने झोपू शकतो.

७. अंघोळीनंतर लगेच जेवण करू नये; कारण पचनक्रिया करणार्‍या पेशींचे तापमान न्यून झाल्याने त्या अन्न पचवत नाहीत. त्यामुळे वात होतो. पोटाचा आकार वाढतो. खाल्ल्यानंतर १ घंटा अंघोळ करू नये किंवा अंघोळीनंतरही ३० मिनिटांनी जेवावे.

– सौ. वैदेही कुलकर्णी, योगशिक्षिका, मेडिकल योग थेरपिस्ट, न्युरोथेरपिस्ट, पुणे.