गोव्यात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी घुसखोरांना आंध्रप्रदेश पोलिसांनी घेतले कह्यात

घुसखोरांनी पोखरलेला देश ! बांगलादेशी घुसखोर गोव्यात वास्तव्यास असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. फोंडा तालुक्यात माशेल येथे वास्तव्यास असलेल्या काही बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांना ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवले होते. बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांची भीती वाटत नसल्याने ते गोव्यात पुन्हा जूनमध्ये वास्तव्यास आले. घुसखोरांकडे मतपेढी या दृष्टीने पाहून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई न केल्यास देशात ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोरांची वस्ती निर्माण होऊन तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांना आव्हान दिले जाऊ शकते, असे देशप्रेमी नागरिकांना वाटते !

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, ४ जुलै (वार्ता.) – गोव्यात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी घुसखोरांना आंध्रप्रदेश पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ‘हावरा ते वास्को-द-गामा’ या  रेल्वेगाडीने गोव्यात येत असतांना पोलिसांनी ही कारवाई केली.
आंध्रप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कह्यात घेतलेल्या या ८ बांगलादेशी घुसखोरांकडे पारपत्र (पासपोर्ट) आदी कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नव्हते; मात्र त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, ‘पॅन’ कार्ड आणि मतदान ओळखपत्र होते. बनावट प्रमाणपत्रांवर बेंगळुरूचा पत्ता होता. बांगलादेशी घुसखोर आंध्रप्रदेश पोलिसांना म्हणाले, ‘‘आम्ही वर्ष २०१७ ते २०१९ या काळात गोव्यात वास्तव्यास होतो; मात्र गतवर्षी कोरोना महामारी आल्याने आम्ही पुन्हा बांगलादेशमध्ये मूळ गावी गेलो. जून मासात आम्ही पुन्हा गोव्यात परतलो.’’ (बांगलादेशी घुसखोर अशा प्रकारे बनावट ओळखपत्रे वापरून गोव्यात वर्ष २०१७ ते २०१९ या काळात राहीपर्यंत गोव्याचे पोलीस, देशाची गुप्तहेर संघटना आणि सुरक्षा व्यवस्था काय करत होत्या ? अशा प्रकारे किती बांगलादेशी घुसखोर गोव्यात रहात आहेत, ते गोवा शासनाने ‘कोबिंग ऑपरेशन’ करून (कसून शोध घेऊन) उघड करण्यासमवेतच त्यांना देशाबाहेर हाकलून लावणे आवश्यक ! – संपादक)