अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१८ ऑगस्ट या दिवशी भारताचा तिथीनुसार ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. यानिमित्ताने विशेष लेख …

नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

१. प्रस्तावना आणि उद्देश

श्री. रूपेश रेडकर

‘व्यक्तीच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांवरून त्याच्या आध्यात्मिक स्थितीविषयी कळू शकते. एखाद्याचे साधना आरंभ करण्यापूर्वीचे आणि अध्यात्मात चांगली प्रगती केल्यानंतरचे (सत्त्वगुण वाढल्यानंतरचे) अशा दोन छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्या व्यक्तीतील आध्यात्मिक स्तरावरील पालट लक्षात येतात. हा पालट जाणण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे व्यक्तीच्या सौंदर्याचा आणि सात्त्विकतेचा संबंध नसतो. दिसायला सुंदर नसलेल्या; पण सात्त्विक असलेल्या व्यक्तीकडून सुंदर दिसणार्‍या; पण सात्त्विक नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत चांगली स्पंदने जाणवतात. व्यक्तीच्या संदर्भात छायाचित्रातून जे कळू शकते, ते राष्ट्राच्या संदर्भात मानचित्रातून (नकाशातून) कळू शकते. गेल्या १०० वर्षांत भारतात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. परिणामी भारताच्या मानचित्रात (नकाशात) अनेक पालट झाले; पण ‘आध्यात्मिक स्तरावर भारताच्या स्थितीत काही पालट झाला का ?’, हे जाणून घेण्यासाठी ‘अखंड भारताचे मानचित्र (नकाशा)’ आणि ‘सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा)’ यांच्या वातावरणावर होणार्‍या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास केला. त्यासाठी २१.१०.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात घेण्यात आलेल्या चाचणीत ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पटलावर कोणतेही छायाचित्र ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाची ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्रे घेतली. ही मूळची नोंद होय. त्यानंतर अनुक्रमे अखंड भारताचे मानचित्र आणि सध्याच्या भारताचे मानचित्र ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या ‘पिप’ छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘दोन्ही मानचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे जाणता आले.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) : भारताच्या (वर्ष १९२० पूर्वीच्या) अविभाजित स्वरूपाला ‘अखंड भारत’ संबोधले जाते. तिबेट, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे सर्व देश अखंड भारताचे अविभाज्य घटक होते. हे मानचित्र (नकाशा) तेव्हाच्या अखंड भारताचे आहे.

३ आ. सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) : वर्ष १९२० नंतर अखंड भारताचे अनेकदा विभाजन म्हणजे फाळणी झाली. परिणामस्वरूप तिबेट, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान भारतापासून वेगळे झाले. हे मानचित्र (नकाशा) सध्याच्या भारताचे आहे.

४. ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाची ओळख !

या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. ‘पिप’ या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्‍याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. हे रंग कशाचे दर्शक आहेत, ते सूत्र ‘७ अ’ या सारणीतील दुसर्‍या उभ्या स्तंभात दिले आहे.

५. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

अ. या चाचणीची ‘पिप’ छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा चाचणीतील घटकाच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.

आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

६. चाचणीतील निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

६ अ. मूळची नोंद (वातावरणाची मूलभूत प्रभावळ) : चाचणीमध्ये एखाद्या घटकामुळे (उदा. या चाचणीत नकाशाची प्रत ठेवल्यामुळे) वातावरणात झालेला पालट अभ्यासण्यासाठी त्या घटकाचे ‘पिप’ छायाचित्र घेतात; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाचे ‘पिप’ छायाचित्र प्रथम घ्यावे लागते. याला ‘मूळची नोंद’ म्हणतात. घटकाच्या ‘पिप’ छायाचित्राची मूळच्या नोंदीशी, म्हणजेच वातावरणाच्या मूलभूत प्रभावळ दर्शवणार्‍या ‘पिप’ छायाचित्राशी तुलना केल्यानंतर त्या घटकामुळे वातावरणात झालेला पालट लक्षात येतो.

६ आ. मूळच्या नोंदीच्या (वातावरणाच्या मूलभूत प्रभावळीच्या) तुलनेत वस्तूची प्रभावळ दर्शवणार्‍या ‘पिप’ छायाचित्रातील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होण्यामागील तत्त्व : चाचणीसाठी वस्तू (उदा. या चाचणीत नकाशाची प्रत) ठेवण्यापूर्वीच्या (मूळच्या नोंदीच्या) तुलनेत वस्तू ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या वस्तूतून प्रक्षेपित होणार्‍या त्या रंगांशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी वस्तू ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. (हे लक्षात घेऊन ‘७ अ’ आणि ‘७ आ’ या सारण्या वाचाव्यात.)

६ इ. प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती : चाचणीतील वस्तूच्या (किंवा व्यक्तीच्या) ‘पिप’ छायाचित्रात दिसणार्‍या प्रभावळीचे रंग हे त्या वस्तूच्या ऊर्जाक्षेत्रातील विशिष्ट स्पंदने दर्शवतात. प्रभावळीतील प्रत्येक रंगाविषयी ‘पिप’ संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी उपलब्ध केलेल्या कार्यपुस्तिकेतील (‘मॅन्युअल’मधील) माहिती आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या शेकडो चाचण्यांतील निरीक्षणांचा अनुभव यांच्या आधारे ‘प्रत्येक रंग कोणत्या स्पंदनाचा दर्शक आहे ?’, ते निश्‍चित केले आहे. ते सूत्र ‘७ अ’ या सारणीतील दुसर्‍या उभ्या स्तंभात दिले आहे.

६ ई. सकारात्मक स्पंदने : ‘पिप’ छायाचित्रातील फिकट गुलाबी, पोपटी, पांढरा (चंदेरी), पिवळा, गडद हिरवा, हिरवा, निळा आणि जांभळा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक ते अल्प लाभदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे ‘सकारात्मक स्पंदने’ असे संबोधले आहे.

६ उ. नकारात्मक स्पंदने : ‘पिप’ छायाचित्रातील राखाडी, गुलाबी, नारिंगी आणि भगवा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक त्रासदायक ते अल्प त्रासदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे ‘नकारात्मक स्पंदने’ असे संबोधले आहे.

६ ऊ. ‘पिप’ छायाचित्रात सर्वसाधारणपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक रंग दिसणे अधिक चांगले ! : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (चंदेरी) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

६ ए. ‘पिप’ छायाचित्रातील रंगांच्या वैशिष्ट्यांचा त्या रंगाच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्याशी संबंध नसणे : ‘पिप’ संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी ‘पिप’ छायाचित्रात नकारात्मक स्पंदनांसाठी भगवा आणि नारिंगी, हे रंग निर्धारित केले आहेत. त्याचा आणि त्या रंगांच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा (उदा. भगवा रंग त्याग अन् वैराग्य यांचे प्रतीक आहे.) कोणताही संबंध नाही.

७. निरीक्षणे

७ अ. निरीक्षण १ – ‘पिप’ छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग, ते कशाचे दर्शक आहेत आणि त्यांच्या प्रमाणात झालेली वाढ किंवा घट : अखंड भारताचे मानचित्र आणि सध्याच्या भारताचे मानचित्र यांच्या प्रभावळींची तुलना मूळच्या नोंदीशी केली आहे, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

टीप १ : घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप २ : पिप छायाचित्रातील पांढरा रंग पूर्ण पांढरा दिसत नाही, तसेच ‘पिप’ कार्यपुस्तिकेत (मॅन्युअलमध्ये)‘व्हाईट / सिल्वर’ असा उल्लेख आढळल्याने ‘पांढरा / चंदेरी’ हे शब्द वापरले आहेत.

टीप ३ : घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

फाळणीपूर्व नकाशातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ८० टक्के आहे, तर फाळणीनंतरच्या नकाशात ते अल्प, म्हणजे ६४ टक्केच आहे, हे वरील आलेखावरून स्पष्ट होते.

७ आ. निरीक्षण ३ – ‘पिप’ छायाचित्रांतील प्रत्येक स्पंदनाचे (रंगांचे) प्रमाण (टक्के)

टीप : छायाचित्रांत दिसणार्‍या विविध रंगांचे प्रमाण ठरवण्यासाठी ‘पिप’ छायाचित्रावर आलेख कागदावर असतात, तशा अनेक चौकटी संगणकीय प्रणालीद्वारे योजल्या. त्यानंतर छायाचित्रातील एकूण चौकटी आणि त्यांच्या तुलनेत प्रभावळीतील प्रत्येक रंगाने व्यापलेल्या चौकटी यांची संख्या मोजली. त्यांचे टक्क्यांमध्ये रूपांतर करून प्रभावळीतील प्रत्येक रंगाचे प्रमाण (टक्के) सर्वसाधारणपणे निश्‍चित केले.

८. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष

८ अ. मूळची नोंद – सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे : कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा सनातन आश्रमात केलेली असल्याने वातावरणाच्या मूलभूत प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.

८ आ. अखंड भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीत पवित्रतेचा पांढरा (चंदेरी) रंग पुष्कळ प्रमाणात दिसणे : सध्याच्या भारताच्या मानचित्राच्या तुलनेत अखंड भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीत सकारात्मक रंगांपैकी चैतन्याचा पिवळा, उच्च प्रतीचा पवित्रतेचा पांढरा (चंदेरी) रंग आणि काही प्रमाणात सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता असलेला पोपटी रंगही दिसू लागला, तर नकारात्मक रंगांपैकी भगवा अन् भावनिक तणावाचा नारिंगी हे रंग पुष्कळ प्रमाणात घटले आहेत, म्हणजे या मानचित्रात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदनांचे प्रमाण अधिक आहे. याचे कारण आताच्या तुलनेत पूर्वी समाज अधिक प्रमाणात धर्माचरणी अन् साधना करणारा असल्याने सात्त्विकतेचे प्रमाण आताच्या तुलनेत अधिक होते. तेव्हा राजकीयदृष्ट्या भारत पारतंत्र्यात होता; पण त्या काळच्या बहुसंख्य लोकांमध्ये प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम होते. त्यांच्यात स्वसुखाचा त्याग करून स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलीदान करण्याची सिद्धता होती. गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांचे समाजातील प्रमाण, तसेच जल-वायू आदी नैसर्गिक घटकांचे प्रदूषण सांप्रत काळाच्या तुलनेत अल्प होते.

८ इ. अखंड भारताच्या मानचित्राच्या तुलनेत सध्याच्या भारताच्या मानचित्रातून आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे : अखंड भारताच्या मानचित्राच्या तुलनेत सध्याच्या भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीतील चैतन्याचा पिवळा रंग पुष्कळ घटला, तर नकारात्मकतेचा भगवा अन् नारिंगी रंग वाढला आहे, म्हणजे या मानचित्रात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदनांचे प्रमाण अल्प आहे. याचे कारण पूर्वीच्या तुलनेत सध्याचा भारतातील सात्त्विकतेचे प्रमाण पुष्कळ अल्प आहे. सध्याचा भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र आहे; पण बहुसंख्य लोकांमध्ये स्वसुखाला सर्वोच्च प्राधान्य देणारी आत्मकेंद्रित वृत्ती अधिक प्रमाणात आढळते. राज्यकर्त्यांनी भारताला ‘निधर्मी’ राष्ट्र घोषित केले. परिणामी या देशाला धर्माचे अधिष्ठान उरले नाही. स्वातंत्र्यानंतर समाजाला साधना न शिकवल्याने समाजाचे आध्यात्मिक, तसेच नैतिकदृष्ट्याही अधःपतन झाले. गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांनी परिसीमा गाठली आहे. शहरीकरणामुळे जल-वायू आदी नैसर्गिक घटकांचे प्रदूषण पुष्कळ वाढले आहे. देशात रहाणार्‍या व्यक्तींकडून येणारी स्पंदने त्या देशाच्या मानचित्रातही आकृष्ट होतात.

केवळ आर्थिक महासत्ता बनल्याने नव्हे, तर भारतियांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती केल्याने भारतियांचे जीवन आनंदी होऊ शकेल, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१५.११.२०१६)

ई-मेल : [email protected]

घटकाची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासण्याचा हेतू

‘एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.’