कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

नवी देहली – कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे. त्यामुळे भीतीमुळे खातेदारांनी गेल्या १५ दिवसांत बँकांतून तब्बल ५३ सहस्र कोटी काढले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून पुढे आली. बँकांमधून काढण्यात आलेली ही रक्कम गेल्या १६ मासांतील उच्चांकी रक्कम ठरली आहे. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक रोख रकमेलाच पसंती देत असल्याने त्यांनी खात्यातून पैसे काढण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.