पुणे – पुणे ते देहली रेल्वे प्रवासामध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रवास ३० घंट्यांचा असून साहित्य संमेलनही ३० घंटे चालणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विकासमंत्री उदय सामंत यांनी दिली.
देहली येथे २१ ते २३ फेब्रुवारीला होणार्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी जाणार्या साहित्य रसिकांच्या ‘महादजी शिंदे एक्सप्रेस’ला यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी ते बोलत होते.
रेल्वे प्रयाणापूर्वी पुस्तक दिंडी काढण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या रेल्वेमध्ये १ सहस्र २०० ज्येष्ठ साहित्यिक प्रवास करत आहेत.