
मुंबई – चांदिवली विधानसभा क्षेत्रात अमली पदार्थांची विक्री आणि सेवन रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. या परिसरात मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीची गंभीर नोंद घेऊन या संदर्भात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य दिलीप लांडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती. राज्यात शाळा, महाविद्यालये, रेल्वेस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी अमली पदार्थविरोधी भित्तीपत्रके अन् जनजागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे समाजात अमली पदार्थांच्या वापराविरुद्ध जनजागृती करण्यात येत असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.
राज्यमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले की, वर्ष २०२३ आणि वर्ष २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. मटका, जुगार आणि ऑनलाईन लॉटरीवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या परिसरात गांधीनगर, काजूपाडा आणि परिसरातील अवैध गुटखा विक्रीच्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. यानंतर राज्य सरकारने ‘अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात विशेष पोलीस पथक तैनात केले जाणार आहे. वर्ष २०२४ मध्ये अमली पदार्थ कायद्यांतर्गत १५ सहस्र ८७६ गुन्हे नोंद झाले असून १४ सहस्र २३० आरोपींना अटक करण्यात आली आहे.