गंगा नदीचे महत्त्व !

देवनदी गंगा

१. मनुष्‍याचे पाप नष्‍ट करणारी गंगा !

पद्मपुराणात उल्लेख आहे की, ज्‍याप्रमाणे अग्‍नीच्‍या तडाख्‍यात सापडल्‍यानंतर रूई आणि कोरडी पाने क्षणार्धात भस्‍मसात होतात, त्‍याच प्रकारे गंगा नदी तिच्‍या जलाच्‍या स्‍पर्शाने मनुष्‍याचे सारे पाप एका क्षणात नष्‍ट करते.

२. सिकंदराने केलेली गंगास्‍तुती !

संपूर्ण जग जिंकण्‍याचे स्‍वप्‍न पहाणारा सिकंदरही गंगा किनारी येऊ इच्‍छित होता. सिकंदर त्‍याच्‍या थकलेल्‍या सैनिकांसमोर भाषण करतांना म्‍हणाला होता, ‘जर कुणी माझ्‍या या युद्धाचा अंत पाहू इच्‍छित असेल, तर त्‍याने हे लक्षात ठेवावे की, जोपर्यंत आम्‍ही गंगेच्‍या जवळ पोचत नाही, तोपर्यंत युद्धाचा शेवट होत नाही.’

३. सेल्‍यूकस, अकबर आणि औरंगजेब यांना लक्षात आलेले गंगाजलाचे महत्त्व

३ अ. विविध देश पादाक्रांत करण्‍याच्‍या मोहिमेवर निघालेल्‍या सेल्‍यूकसलाही गंगा नदी ठाऊक होती. सेल्‍यूकसचा राजदूत मॅगस्‍थनीज कित्‍येक वर्षे चंद्रगुप्‍ताच्‍या राजधानीत पाटणा येथे राहिला. मॅगस्‍थनीजने उल्लेख केला आहे की, गंगा पृथ्‍वीवरील अतिशय महान नदी आहे. तिसर्‍या शतकात ख्रिस्‍ती लेखकांनी गंगेचा ‘स्‍वर्गातील नदी’च्‍या स्‍वरूपात उल्लेख केला आहे.

३ आ. अबुज फजल याने लिहिलेल्‍या ‘अकबरनामा’ या ग्रंथाचा तिसरा भाग ‘आईन ए अकबरी’ यामध्‍ये गंगेचा उल्लेख आहे. अकबरला गंगाजल अतिशय प्रिय होते.

३ इ. फ्रान्‍सचा पर्यटक बर्नियर याने उल्लेख केला आहे की, औरंगजेब गंगाजल प्राशन करत होता.

३ ई. फ्रान्‍सचाच आणखी एक पर्यटक टॅवर्नियरने एके ठिकाणी लिहिले आहे की, गंगेतील औषधी गुणांचे महत्त्व लक्षात घेऊन मुसलमान नवाब दूर दूरहून गंगाजल मागवत होते.

४. वैज्ञानिकदृष्‍ट्या सिद्ध झालेले गंगाजलाचे दिव्‍य आणि दुर्लभ गुण !

हिमालयातील वनौषधी आणि अन्‍य खनिजे यांमधून वहाणार्‍या गंगेत दिव्‍य आणि दुर्लभ गुण आहेत, हे वैज्ञानिकदृष्‍ट्याही फार पूर्वीच सिद्ध झाले आहे. या संदर्भात अनेक पुरावेही मिळाले आहेत. इंग्‍लंडचा राजा एडवर्ड (सातवा) याच्‍या राज्‍याभिषेक सोहळ्‍याला जातांना जयपूरचे राजे सवाई माधोसिंह (द्वितीय) चांदीच्‍या घागरीत गंगेचे ६१५ लिटर पाणी घेऊन गेले होते. त्‍या घागरी राजा एडवर्ड याच्‍या मृत्‍यूनंतर १९२२ मध्‍ये राजप्रासादात ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या. १९६२ मध्‍ये त्‍यावरील आवरण काढण्‍यात आले. तेव्‍हाही गंगाजल आधीप्रमाणेच स्‍वच्‍छ आणि शुद्ध होते. वर्ष १८८३ मध्‍ये हरिद्वार येथे गंगाजलाचे परीक्षण करणार्‍या ‘युनेस्‍को’च्‍या (संयुक्‍त राष्‍ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्‍कृतिक संस्‍थेच्‍या) वैज्ञानिकांनाही प्रत्‍यक्ष हे लक्षात आले की, गंगेत मृतदेह, हाडे इत्‍यादी प्रदूषित करणारे घटक वाहूनही काही फुटांखालील पाणी पूर्णपणे स्‍वच्‍छ होऊन जाते. (गंगा नदीवर टीका करणारे आणि तिच्‍या पवित्रतेविषयी शंका उपस्‍थित करणारे याविषयी काही बोलतील का ? – संपादक)

(साभार : मासिक ‘गणानाम् त्‍वां’, जुलै २०१४)