जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून उर्दू शाळांमध्ये अवैधरित्या रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते सुटी  !

उर्दू शिक्षकांच्या सुविधेसाठी निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाचे उत्तर !

जामताडा (झारखंड) – जिल्ह्यातील १०० हून शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुटी देण्यात येत असल्याचे वृत्त दैनिक ‘जागरण’ने प्रसिद्ध केले आहे. शिक्षण विभागाने म्हटले की, या सर्व शाळा उर्दू असल्याने शिक्षकांच्या सुविधेसाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.

१. दैनिक ‘जागरण’चे पत्रकार कौशल सिंह यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ज्या शाळांमध्ये ७० टक्के विद्यार्थी मुसलमान आहेत, तेथे शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे; मात्र अशा प्रकारे सुटी देण्याचा शासनाचा कोणताही आदेश नाही. शाळांच्या व्यवस्थापनाकडून अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला आहे.

२. शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की, जिल्ह्यातील एकूण १ सहस्र ८४ शाळांपैकी केवळ १५ उर्दू शाळांना शुक्रवारची सुटी दिली जात आहे. (शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शाळांनी असा निर्णय घेतला असेल, तर तो गुन्हाच आहे. शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. उलट विभागाकडून असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

३. बिराजपूर माध्यमिक विद्यालयाचे सचिव दीप नारायण मंडल यांनी सांगितले, ‘सुमारे ८ मासांपूर्वी स्थानिक मुसलमान गावकर्‍यांनी शाळेला शुक्रवाची सुटी देण्यासाठी गोंधळ घातला होता. त्या वेळी आम्ही शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याविषयी पत्र पाठवून माहिती दिली होती; मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता गावकर्‍यांच्या दबावामुळे शुक्रवारची सुटी दिली जात आहे.’

४. नावाडीह पंचायतीच्या महिला सरपंचाचे पती सज्जाद अंसारी यांनी सांगितले की, शुक्रवारची सुटी देण्याची व्यवस्था पूर्वीपासून येथे चालू आहे.

५. जामताडा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अभय शंकर यांनी सांगितले, ‘येथे शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे, अशी कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. जर असे होत असेल, तर आम्ही ते थांबवू आणि संबंधितांवर कठोर कारवाई करू.’ (शिक्षण विभाग एक माहिती देतो, तर शिक्षणाधिकारी दुसरीच माहिती देतात, यावरून त्यांच्यात किती गोंधळ आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

६. याविषयी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल मरांडी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, यापूर्वी राज्यातील गढवा येथे हात जोडून प्रार्थना करण्यावर बंदी घालण्यात आली आणि आता जामताडा येथे रविवार ऐवजी शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे. पुढे या शाळांवर ‘उर्दू शाळा’ असेही लिहून टाकावे. मुख्यमंत्री हेमंत सोरेनजी, तुम्ही झारखंडला कोणत्या दिशेने घेऊन जात आहात ?

संपादकीय भूमिका

जर असे आहे, तर संपूर्ण देशात जेथे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू आहेत, तेथे गुरुवारी (हा भगवान दत्तगुुरूंशी निगडित वार असल्यामुळे या दिवशी बहुतांश हिंदू उपासना करत असल्याने ) सुटी घोषित करा ! रविवारची सुटी ही ख्रिस्ती इंग्रजांनी भारतात आणलेली परंपरा आहे !