दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ ‘महिला शौर्यजागृती’ या विषयाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना आलेल्या अनुभूती

‘अनेक दिवसांपासून महिला शौर्यजागृती उपक्रम घेऊया’, असे नियोजन चालू होते. काही कारणांमुळे याचे नियोजन पुढे ढकलले जात होते. ‘दळणवळण बंदीच्या कालावधीत महिलांसाठी विशेष व्याख्यानांचे नियोजन करूया’, असा मनात विचार आला. महाराष्ट्र्रात विविध जिल्ह्यांमध्ये ‘महिला शौर्यजागृती’ या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

१. केवळ ५ मिनिटांच्या कालावधीत विषयाची सिद्धता होणे

‘व्याख्यानाचा विषय नेमका काय घ्यायचा ?’, या संदर्भात आम्ही सर्व जण बोलत होतो. तेव्हा ‘हिंदु महिलांवर झालेल्या असंख्य अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. जवळपास प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वृत्तांतून हिंदु महिलांवर होणारे आघात समोर येत आहेत. हा अन्याय, अत्याचार थांबवण्यासाठी कुणीच सिद्ध नाही. यावर काहीतरी उपाययोजना काढावी लागणार आहे. अजून किती दिवस हे सहन करत बसणार ?’, असे विचार मनात येऊन ‘किती दिवस केवळ अत्याचार सांगून समाजाला जाणीव करून देत रहायचे ? ‘आता महिलांनीच स्वतःतील सामर्थ्य, म्हणजेच देवीतत्त्व जागृत करण्याची वेळ येऊन ठेपली आहे’, असा विचार येऊन सूत्रे लिहायला आरंभ केला. केवळ ५ मिनिटांत ‘श्री बगलामुखी, श्री प्रत्यंगिरा, श्री महाकाली, श्री तनोटमाता आणि श्री कात्यायनी देवी’ या देवींची नावे वहीत लिहिली गेली. त्याच वेळी ‘गूगल’वर असलेली महिलांवर झालेल्या अत्याचारांविषयी माहिती मिळाली. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेली महिलांवरील अत्याचारांची वृत्ते वाचनात आली आणि केवळ ५ मिनिटांमध्ये व्याख्यानाची संहिता सिद्ध झाली.

श्री. सुमित सागवेकर

२. ‘ऑनलाईन’ व्याख्यानात जोडलेल्या ‘प्रत्येक स्त्रीतील देवीतत्त्व जागृत होऊन स्त्रियांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचा वसा हाती घेतला आहे’, असे दृश्य दिसणे

मी प्रत्यक्ष विषय मांडण्यास चालू केल्यानंतर माझे आपोआप देवीशी स्थुलातून बोलणे झाले. मी असे काही बोलायचे ठरवले नसतांना उपस्थित महिलांना सांगितले, ‘‘आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. मला तुमच्यातील देवीतत्त्वाला जागृत करायचे आहे. तिला साकडे घालायचे आहे. मला त्या देवीला गार्‍हाणे घालायचे आहे. आता तिला यावेच लागेल. आपल्या मुला-बाळांच्या रक्षणासाठी देवीला प्रकट व्हावेच लागेल.’’ मी असे सांगितल्यावर मला ‘ऑनलाईन’ जोडलेल्या प्रत्येक स्त्रीचे आज्ञाचक्र प्रज्वलित झाल्यासारखे जाणवले आणि ‘तिच्यापर्यंत हाक पोचली’, असे वाटले. ‘प्रत्येक महिलेतील देवीतत्त्व जागृत होत आहे’, असे मला जाणवले. नंतर मला दिसले, ‘एका जिल्ह्यातील, नंतर राज्यातील आणि त्यानंतर देशातील हिंदु स्त्रियांच्या अंतरातील देवीचे तत्त्व जागृत झाले आहे. या अनेक स्त्रियांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचा वसा हाती घेतला असून याच देवीतत्त्वाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना केली आहे.’

३. ‘देवीची शक्ती हिंदूंना आपत्काळात तारू शकते’, असे वाटणे

हे दृश्य दिसल्यावर मी देवीच्या विराट रूपासमोर नतमस्तक होऊन तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. शिवाची पार्वती ही शक्ती आहे. नरसिंहाची श्री प्रत्यंगिरादेवी शक्ती आहे. मणिमल्ल युद्धात श्री खंडोबा देवाच्या म्हाळसाकांत रूपामध्ये श्री म्हाळसादेवी शक्ती होती. अशा शक्तीची, म्हणजे देवीच्या शक्तीची आज आवश्यकता आहे. शक्तीच्या बळावरच सर्वकाही होऊ शकते आणि ही दैवी शक्तीच हिंदूंना आपत्काळात तारू शकते’, असे मला वाटते.

या अनुभूतीच्या निमित्ताने माझी आदिशक्तीला शरण जाऊन आत्मनिवेदन स्वरूप कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (८.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक