हट्टी मुले !

सध्याचे युग हे ‘स्मार्टफोन’चे आहे आणि त्याचा उपयोग करण्यात विशेषत: लहान मुले हुशार आहेत. ‘वर्तमान जीवनशैलीप्रमाणे सर्व अद्ययावत् असले पाहिजे’, हे योग्य असले, तरी त्याचा कुठे अतिरेक होत आहे का ? याकडे लक्ष असणे आणि तसे निदर्शनास आल्यावर त्याला अटकाव करणेही तितकेच अत्यावश्यक आहे.

सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर देवासमोर हात जोडायला उभे रहाणारी लहान मुले अभावानेच आढळतील, अशी बिकट स्थिती आहे. या कृतीऐवजी त्यांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे मुलांना समजत नसले, तरी पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. बालपणापासून मुलांचे लाडच एवढे पुष्कळ केलेले असतात की, ‘त्यांना हे करू नको’, असे सांगण्यासही पालक धजावत नाहीत. मुलांना पालकांचा धाक असायला पाहिजे; पण सध्या मात्र पालकांनाच मुलांचा धाक असल्याचे निदर्शनास येत आहे. पुढे जाऊन हीच मुले पुष्कळ आगाऊ होतात आणि स्वतःला वाटेल तेच करतात. परिणामी पालक त्यांच्यामुळे कायम त्रस्त रहातात आणि मुले त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने मौजमजा करण्यात दंग रहातात. त्यामुळे ‘हेच खरे जीवन आहे’, असा त्यांचा भ्रम होतो. दिवसाचा आरंभच चुकीच्या सूत्रांपासून होत असल्यावर त्याची फलनिष्पत्ती सकारात्मक कशी असेल ? ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’, असे सुवचन आहे. ती घरी असल्यावर निश्‍चितच चांगले वाटते; पण त्यांच्या बालमनावर ‘संस्कार’ करून ती फुले टवटवीत ठेवण्याचे दायित्व पालकांचे आहे. मुलांच्या बालमनाला योग्य वळण लावण्याऐवजी केवळ त्यांचे लाड करणे म्हणजे संगोपन, असा अयोग्य दृष्टीकोन ठेवल्यास त्यांना हट्टी बनण्यासाठी पोषक वातावरण बनवले जात आहे. ‘आपले मूल सुसंस्कारित असावे’, असे प्रत्येक पालकाला वाटते; पण त्याचे अनावश्यक लाड किती करतो ? आणि त्याला तो जे चुकीचे करत आहे, त्याऐवजी योग्य काय आहे ? याची जाणीव करून किती देतो ? याकडे पालकांचे लक्ष असले पाहिजे. पालकांनी अयोग्य गोष्टी टाळण्याचा आणि योग्य गोष्टी अवलंबण्याचा प्रयत्न स्वत:पासून केल्यास त्यांना मुलांना वळण लावणे सहज जमेल, हे मात्र निश्‍चित !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.