रत्नागिरीत १३ फेब्रुवारीला फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा

रत्नागिरी – पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’च्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे हा मेळावा मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत होणार असून यात फळ प्रक्रिया व्यवसायातील अडचणींच्या निराकरणासाठी बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे.

कोकणची अर्थव्यवस्था बर्‍याच अंशी आंबा, काजू, कोकम, फणस, जांभूळ अशा फळपिकांवर अवलंबून आहे. फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून या क्षेत्रात कार्यरत उद्योजकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. यामध्ये उद्योजकांना जागा, कर्ज, कच्चा माल, यंत्रसामग्री, कायदेशीर गोष्टींची पूर्तता, मार्केटिंग इ. बाबतींत येणार्‍या अडचणी आणि आव्हाने यावर तज्ञांच्या उपस्थितीत खुले चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने उद्योगजकांना येणार्‍या अडचणी आणि शंकानिरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे. या चर्चासत्रात सर्व सहभागींना गोखले इन्स्टिट्यूटकडून ‘सहभाग प्रमाणपत्र’ मिळेल, तसेच उद्योजकांना साहाय्य करणार्‍या ‘दे आसरा फाऊंडेशन’ या संस्थेविषयी जोडून दिले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील फळ प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अधिकाधिक उद्योजकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, तसेच स्वत:च्या उद्योजक मित्रमौत्रिणींना हा संदेश पाठवून त्यानाही निमंत्रित करावे. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे; मात्र सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील फळ प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत असणारे छोटे आणि मोठे उद्योजकांनी नोंदणीसाठी पुढील लिंकवरील गूगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. https:/forms.gle/UG74VNe2Bo2Bt1ak6 गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रकल्प प्रमुख डॉ. केतकी बर्वे यांनी हे आयोजन केले असून अधिक माहितीसाठी स्थानिक श्री. हर्षद तुळपुळे यांना ९४०५९५५६०८ या क्रमांकावर संपर्क करता येईल. नोंदणी केलेल्या सर्वांना कार्यक्रमाचे नेमके ठिकाण १० फेब्रुवारीपर्यंत कळवण्यात येईल.