Sanatan Prabhat Exclusive : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केल्याची नोंद ताळेबंदामध्ये यायला हवी ! – लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी

पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला पत्र पाठवण्यापूर्वी लेखापरीक्षकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना स्पष्ट केली होती भूमिका !

मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) : ताळेबंद अतिशय महत्त्वाचा आहे. ताळेबंद हा संस्था किंवा न्यास यांची स्थिती दर्शवतो. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दरवाजावरील चांदी, तसेच सर्व दागिने यांचे तज्ञांकडून मूल्यांकन व्हायला हवे आणि त्यांची ताळेबंदामध्ये नोंद करायला हवी, असे स्पष्ट मत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे वर्ष २०२१-२२ चे लेखापरीक्षण करणारे लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. ही भूमिका लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी यांनी २६ डिसेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी दूरभाषवर बोलतांना व्यक्त केली होती. ती आता या वृत्ताद्वारे उघड करत आहोत. यातून मंदिर समितीच्या अनागोंदी कारभार उघड झाला आहे.

लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी पुढे म्हणाले, ‘‘आम्ही प्रसादाचे लाडू बनवण्याच्या कारखान्यात स्वत: जाऊन प्रत्यक्ष पहाणी करून अहवालामध्ये सूत्रे मांडली आहेत. मंदिराने केलेल्या करारानुसार ‘लाडावामध्ये शेंगदाण्याचे तेल वापरावे’, असे नमूद केलेले आहे. आम्ही भेट दिली, त्या वेळी तेथे सरकीच्या तेलाचे रिकामे डबे आढळले. लाडू बनवण्यासाठी देवस्थानकडून पैसे दिले जातात. त्यामुळे करारानुसार त्याचे पालनही व्हायला हवे. जी वस्तूस्थिती आम्हाला आढळली, ती आम्ही अहवालामध्ये मांडली आहे. यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक हेतू नाही. ‘यामध्ये सुधारणा व्हावी’, इतकाच आमचा उद्देश आहे.

मंदिरे समितीच्या अन्य काही चांगल्या गोष्टीही आहेत. श्री विठ्ठल लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. आम्ही केलेले लेखापरीक्षण प्राथमिक स्तराचे आहे. लेखापरीक्षण अहवाल करतांना आमच्या हातून देवस्थानची कोणतीही अपकीर्ती होऊ नये, यासाठी आम्ही प्रत्यक्ष पहाणी करूनच वस्तूनिष्ठ लेखापरीक्षण अहवाल दिला आहे. लेखापरीक्षणामध्ये आम्हाला जे आढळले, ते प्रामाणिकपणे देणे, हे आमचे कर्तव्य होते.’’

मंदिरे समितीचा कारभार अनागोंदीच असल्याचे लेखापरीक्षकांच्या पत्रातून उघड !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी २ दिवसांपूर्वी पत्रकारांसमोर मंदिरे समितीच्या वतीने भूमिका मांडली होती. या वेळी राजेंद्र शेळके यांनी मंदिरे समितीला लेखापरीक्षकांकडून २९ डिसेंबर २०२३ या दिवशी मिळालेल्या पत्राचा संदर्भ देत मंदिराचे दागिने गहाळ झाले नसल्याचा उल्लेख लेखापरीक्षण अहवालामध्ये कुठेही नसल्याचे म्हटले. लेखापरीक्षकांनी हे पत्र पाठवण्यापूर्वी, म्हणजे २६ डिसेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी दूरभाषद्वारे बोलतांना व्यक्त केलेली भूमिका वरील वृत्तामध्ये  आहे. या दोन्ही ठिकाणी देवाचे दागिने आणि मंदिरातील चांदी यांची ताळेबंदामध्ये नोंद झाली नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. यावरून मंदिरे समितीचा कारभार अनागोंदीच असल्याचे लेखापरीक्षकांच्या पत्रातून उघड होत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ने मंदिरांचा हाच अनागोंदी कारभार स्पष्टपणे नमूद केला आहे. मागील ३८ वर्षांत मौल्यवान दागिन्यांचा ताळेबंद झालेला नाही, हाच मंदिरे समितीचा कारभार संशयास्पद आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे दागिन्यांच्या नोंदी नसणे, भाविकांसाठी रेल्वेच्या जागेवर प्रसाधनगृह बांधायला झालेला विलंब, लाडवांच्या प्रसादामध्ये झालेला भ्रष्टाचार आदींविषयी अर्धवट आणि चुकीची माहिती दिली. याविषयीची वस्तूस्थिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २ जानेवारी २०२४ च्या अंकात ठळक वृत्ताद्वारे मांडण्यात आली आहे. हे पहा –

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अनागोंदी कारभाराची कार्यकारी अधिकार्‍यांकडून स्वीकृती !