भारताच्या फाळणीची भीषणता दर्शवणारे मंत्रालयात चित्रप्रदर्शन !

मंत्रालयात लावलेले चित्रप्रदर्शन

मुंबई, १७ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या भारतियांच्या नरसंहाराची भीषणता दर्शवणारे चित्रप्रदर्शन महाराष्ट्राच्या मंत्रालयात लावण्यात आले आहे. केंद्रशासनाने १४ ऑगस्ट हा ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच मंत्रालयात येणारे नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. भारताच्या फाळणीमुळे पाकिस्तानमध्ये गेलेल्या जवळपास ६० लाख मुसलमानेतरांना भारतात यावे लागले. पंजाब, देहली आदी भागांतील ६५ लाख मुसलमानांना पाकिस्तानत जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘देशाच्या फाळणीचे दुख: कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसाचार यांमुळे लाखो बंधू-भगिनींना विस्थापित व्हावे लागले, स्वत:चे प्राण गमवावे लागले’, अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.