पुणे येथून गेल्‍या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे – महाराष्‍ट्रातून गेल्‍या ३ मासांत १६ ते २५ वर्षे वयोगटातील ३ सहस्र ५९४ तरुणी राज्‍यातून बेपत्ता झाल्‍या आहेत. राज्‍य सरकारच्‍या संकेतथळावर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्‍याची आकडेवारी चिंताजनक आहे, असे म्‍हणत राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. गेल्‍या ३ मासांत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील ४४७ महिला बेपत्ता झाल्‍या आहेत. रूपाली चाकणकर यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.

बेपत्ता महिलांविषयी उघड केलेली माहिती

१. या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत पुणे शहरातील १४८, पिंपरी-चिंचवडमधील १४३ आणि पुणे ग्रामीणमधून १५६ महिला आणि मुली बेपत्ता झाल्‍या आहेत.

२. ८२ महिला आणि मुली नोकरी किंवा इतर कारणांसाठी परदेशात गेल्‍यानंतर त्‍यांचा कुटुंबातील सदस्‍यांशी संपर्क तुटला. त्‍या वेळी अशा महिला आणि मुली यांची ओमान आणि दुबईत तस्‍करी झाली असण्‍याची भीती आहे आणि हे प्रकरण राज्‍य महिला आयोगाने पत्राद्वारे परराष्‍ट्र मंत्रालयाकडे पाठवले आहे. (यामध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ची नेमकी किती प्रकरणे आहेत, हेही पुढे आले पाहिजे ! – संपादक)

३. गेल्‍या ३ वर्षांत देशात सर्वाधिक महिला आणि मुली बेपत्ता झाल्‍याची नोंद महाराष्‍ट्रात झाली आहे. राज्‍य महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी समिती स्‍थापन करून दर १५ दिवसांनी राज्‍य महिला आयोगाने अहवाल सादर करण्‍याचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

संपादकीय भूमिका

  • मुली आणि महिला बेपत्ता होण्‍याच्‍या कारणांचा सखोल अभ्‍यास करून त्‍यावरील उपाययोजनांविषयी जनजागृती आणि कृती हवी !
  • राज्‍यातील काही जिल्‍ह्यांतून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला किंवा युवती बेपत्ता होणे चिंताजनक आहे. सरकारने याविषयी सखोल चौकशी करून सत्‍य जनतेसमोर आणावे आणि दोषींना कारागृहात टाकावे !