कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याने त्याला अनुमती नाकारावी !

हिंदु महासभेचे नेते स्वामी चक्रपाणी यांची मागणी

जर मुसलमान आणि हिंदु या लसीद्वारे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवत आहेत, तर सरकारने या लसीमध्ये कोणत्या घटकांचा वापर करण्यात आला आहे, हे अधिकृतपणे घोषित करावे, असेच जनतेला वाटते ! एरव्ही औषधांवर ते कोणत्या घटकांद्वारे बनवण्यात आलेले आहेत, याचा उल्लेख केलेला असतोच !

डावीकडून स्वामी चक्रपाणी

नवी देहली – ‘आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकामध्ये जी लस निर्माण करण्यात आली आहे, त्यामध्ये गायीचे रक्त वापरण्यात आले आहे’, असा दावा करत हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी ‘भारतामध्ये या लसीचा वापर करण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी केली आहे. ‘जोपर्यंत कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आलेले नाही, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत अगदी जीव गेला, तरी ही लस घेणार नाही’, असेही स्वामी चक्रपाणी म्हणाले. चक्रपाणी यांनी यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यापूर्वी मुसलमानांच्या संघटनांनी लसीमध्ये डुकराचा अंश असल्याचे सांगत यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. पुढील मासापासून भारतामध्ये कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वामी चक्रपाणी यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे, हे स्पष्टपणे सांगितले जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात आहे कि नाही, हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये.

२. कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे; मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही. जेव्हा कोणतेही आस्थापन एखादे औषध बनवते, तेव्हा त्यामध्ये काय आहे, याची माहिती दिली जाते; मग कोरोनाच्या लसीच्या संदर्भातील माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध का केली जात नाही ?

३. सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानण्यात येते. जर गायीचे रक्त आपल्या शरिरामध्ये गेले, तर तो आमचा धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच कोरोनाची कोणतीही लस येत असेल, तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. सर्व शंका दूर झाल्यानंतरच लसीकरणाचे काम हाती घेण्यात यावे.

४. पहिल्यांदा ‘विश्‍वास निर्माण करा, मग वापर करा’ या धोरणाचा आपण अवलंब केला पाहिजे. ‘या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आलेल नाही’, असा विश्‍वास आधी जनतेमध्ये निर्माण करावा लागेल. त्यानंतर ही लस द्यावी. जीव गेला तरी चालेल पण धर्म भ्रष्ट होता कामा नये.