दळणवळण बंदी असतांनाही मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद

रत्नागिरी – देशात दळणवळण बंदी असतांना आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे.

दळणवळण बंदीच्या काळात नागरिकांनी स्थलांतर केल्यास कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका वाढतो आणि त्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही वाढतो. त्यामुळे दळणवळणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच संबंधित बोट मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, मेरीटाईम बोर्ड कायदा आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेला कायदा या कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बोट चालकांनी अधिकचे पैसे घेऊन प्रवाशांची वाहतूक केल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.