समर्थ भारत समर्थ सेना !

भारतीय लष्कराचे पहिले ‘कमांडर इन चीफ ऑफ स्टाफ’ (पुढे हे पद ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ (लष्करप्रमुख) असे झाले.) जनरल (पुढे फील्ड मार्शल) एम्.के. करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ या दिवशी तत्कालीन ब्रिटीश ‘कमांडर इन चीफ’कडून सूत्रे स्वीकारली. ३ वर्षांपूर्वीपर्यंत ‘लष्करदिन’ प्रतिवर्षी देहली कॅन्टोन्मेंटमध्ये साजरा केला जात असे. तिथे या दिवशी संचलनानंतर लष्करी शौर्य, सेवा आणि अन्य पुरस्कार यांचे वितरण केले जाते. ‘लष्करदिनाचे हे दिमाखदार संचलन देशभरातील विविध ठिकाणी घेण्यात यावे’, असा निर्णय केंद्र सरकारने ३ वर्षांपूर्वी घेतला, जेणेकरून विविध ठिकाणच्या नागरिकांनाही देशाचे लष्करी सामर्थ्य आणि शिस्त यांचे दर्शन घडेल. त्यानुसार पहिले संचलन बेंगळुरू, तर दुसरे लक्ष्मणपुरी (लखनौ, उत्तरप्रदेश) येथे पार पडले. तिसर्‍या वर्षी यंदा पहिल्यांदाच हे संचलन पुण्यात पार पडले. प्रतिवर्षी विविध ठिकाणी हे संचलन करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून त्यामुळे त्या त्या भागातील नागरिक लष्कराशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जातील. तेथील युवकांनाही लष्करात जाण्याची प्रेरणा मिळेल.

१. पुणे कॅन्टोन्मेंटला (लष्करी छावणीला) लष्करी नकाशात मानाचे स्थान !

पुणे ही लष्करासाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे. लष्कराच्या दुसर्‍या क्रमांकाच्या संस्था पुण्यामध्ये आहेत. ७-८ राज्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा अनेक संस्था पुण्यातच आहेत. याखेरीज पुण्यात काही महत्त्वाचे लष्करी तळही आहेत. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (‘डी.आर्.डी.ओ.’च्या) विविध प्रयोगशाळा, आघाडीच्या शैक्षणिक अन् संशोधन संस्था यांचे जाळे यामुळे पुणे कँटोमेंटला लष्करी नकाशात मानाचे स्थान आहे. त्यामुळे लष्कर दिनाचे संचलन पुण्यात होण्याचे एक वेगळेच औचित्य आहे. या कार्यक्रमापूर्वी २ आठवडे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘नो युअर आर्मी’ (भारतीय लष्कर जाणून घ्या !), या प्रदर्शनाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकांना लष्कर जाणून घेता आले, लष्कराचे सामर्थ्य अनुभवता आले, शस्त्रे जवळून पहाता आली. त्याचप्रमाणे आता संचलनासाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

२. सक्षम आणि सुसज्ज भारतीय लष्कर

भारतीय लष्कर अत्यंत व्यावसायिक आणि जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक आहे. ‘कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लष्कर सक्षम आणि सुसज्ज आहे’, अशी ग्वाही नुकतीच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माध्यमांना दिली. भारत-चीन सीमा सध्या शांत आहे; मात्र सीमा वाद संपलेला नाही; परंतु चीनच्या सीमेवर कुठल्याही प्रकारचे आव्हान उभे राहिले, तरी त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादावर आपण बहुतांशी नियंत्रण मिळवले आहे; मात्र पाकिस्तानने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याचाही बीमोड करण्यासाठी आपण सज्ज आहोत. अन्य शेजारील देशांमधील परिस्थिती आणि घडामोडी यांवरही आपले बारीक लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

३. ‘आत्मनिर्भर भारत’मुळे भारताची ओळख ‘शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा एक मोठा देश’ !

दुसरीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ सूत्रानुसार लष्करातील शस्त्रांचे आधुनिकीकरण वेगाने चालू आहे. अनेक शस्त्रे भारतातच सिद्ध होत आहेत. १० वर्षांपूर्वी आपल्याला लागणारी ७० टक्के शस्त्रे इस्त्रायल, अमेरिका, रशिया आदी देशांतून आयात केली जात होती. आता हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षाही न्यून झाले आहे. येत्या ४ ते ५ वर्षांमध्ये १०० टक्के भारतीय बनावटीची शस्त्रे असतील, अशी खात्री वाटते. एकेकाळी ‘शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश’, अशी भारताची ओळख होती; पण आता आपण ‘शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा एक मोठा देश’ बनलो आहोत. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने २१ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात केली आहेत. शस्त्रास्त्र निर्यात केल्याने उत्पादनाचे प्रमाण वाढून उत्पादन व्यय न्यून होतो. भारतीय बनावटीचे ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र आपण फिलीपाइन्सला पुरवले आहे. आता हेच व्हिएतनाम आणि इंडोनेशियाही मागत आहे, हे स्वागतार्ह आहे. खासगी क्षेत्रालाही ‘मेक इन इंडिया’मध्ये (भारतात उत्पादन करणे) सामील करून घेतले आहे. आघाडीच्या खासगी कंपन्याही परदेशात निर्यात करत आहेत. सैन्यासाठी आवश्यक सर्व दारूगोळाही देशातच बनत आहे, हीसुद्धा अभिमानाची गोष्ट आहे.

४. लष्कराने गाठलेला प्रगतीचा मोठा पल्ला

कारगिल युद्धात आपल्याला प्रचंड खर्च करून दारूगोळा विकत घ्यावा लागला होता. त्यासाठी दुप्पट, चौपट किंमत मोजावी लागली होती. कोणतेही महत्त्वाचे शस्त्र आपल्यालाच बनवता आले पाहिजे, हे देशाचे धोरण असून त्याला यशही येत आहे. शस्त्रांबरोबरच ती शस्त्रे वापरणारा सैनिकही महत्त्वाचा असतो. अग्नीविरांची सध्याची कामगिरी चांगली आहे; मात्र यात काही सुधारणा करायची का ?, हे आणखी काही वर्षांच्या अनुभवावरून निश्‍चित करता येईल. लष्करातील महिला अधिकार्‍यांचे प्रमाण अधिकाधिक वाढवले जात आहे. सध्या लष्करात अनुमाने ३ सहस्र महिला अधिकारी आहेत. पायदळ आणि चिलखती दल (आर्मर्ड कोअर) व्यतिरिक्त सर्वत्र महिलांना प्रवेश देण्यात आला आहे. लष्करी पोलिसांमध्ये महिलांची भरती झालेली आहे. लवकरच अन्यत्रही त्यांना सामावून घेतले जाईल. याखेरीज लष्करात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ‘आर्टिफिशयल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धीमत्ता), ‘मशिन लर्निंग’ (हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा एक भाग आहे किंवा हे ‘प्रोग्रॅमिंग’चे एक असे आधुनिक तंत्र आहे, ज्याद्वारे संगणकीय प्रणाली अशा प्रकारे सिद्ध केल्या जातात की, ती प्रणाली नवीन गोष्टींचा स्वतःहून अभ्यास करायला शिकते आणि आवश्यकतेनुसार स्वतःहून निर्णय घेऊ शकतात.), ‘रोबोटिक्स’, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणाही लष्कराने आत्मसात् केली आहे. ड्रोन, चालकरहित वाहने, उभयचर वाहने, सायबर सिक्युरिटी (संकेतस्थळांचे संरक्षण) आदींमध्येही लष्कराने प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे.

५. विविध खेळ आणि आपत्ती कार्य यांत सैन्याची अतुल्य कामगिरी 

जगातील सर्वाधिक मानाच्या ऑलिंपिकमध्ये लष्करी क्रीडापटूंनी सुवर्णपदकांसह अनेक पदकांवर भारताचे नाव कोरले आहे. ‘मिशन ऑलिंपिक’च्या अंतर्गत लष्कर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू घडवत आहे. लष्कर अनेक पर्यावरणपूरक उपक्रमही राबवत आहेत. सहस्रो निवृत्त लष्करी अधिकारी आणि सैनिक देश उभारणीसाठी मोठे योगदान देत आहेत. देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास लष्कर साहाय्याला धावून जाते. पूर, वादळ, भूस्लख्खन अशा कोणत्याही संकटात सैनिक साहाय्य आणि बचावकार्य यांत आघाडीवर असतात.

६. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या आव्हानांच्या विरोधात भारतीय लष्कर समर्थ

देशाच्या सुरक्षेपुढे अनेक आव्हाने असली, तरी भारतीय सैन्याची क्षमता दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे सामोरे जायला भारतीय लष्कर समर्थ आहे, एवढे आपण खात्रीने नक्कीच सांगू शकतो.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.