सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी गोवा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. अश्विन गावकर

अ. ‘११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सव सोहळा चालू होण्यापूर्वी मला आकाशात गरुड पक्षी उडतांना दिसला.

आ. रथात आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर माझी भावजागृती झाली.

इ. साधक गुरुदेवांचा रथ ओढत होते. त्यांना पाहून माझी भावजागृती झाली आणि डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.

२. सौ. नताशा वत्सा

२ अ. घरून विरोध असतांनाही ब्रह्मोत्सवाला जाता येणे आणि ब्रह्मोत्सव पाहून आल्यावर घरातील वातावरण आपोआप चांगले होणे : ‘मला घरून साधनेला पुष्कळ विरोध आहे. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी घरातील वातावरण तणावाचे होते. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा धावा करत होते. मी उत्सवाच्या ठिकाणी गेल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला आनंद मिळाला. माझे मन नामजपात रंगून गेले. दुसर्‍या दिवशी घरातील वातावरण आपोआप पालटले आणि विरोध दूर झाला.’

रथात विराजमान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, डावीकडे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

३. सौ. मनाली भाटकर

अ. ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी कार्यक्रमाला जाणार्‍या साधकांना उत्सवचिन्ह (टीप) दिले होते. ते पाहून माझी भावजागृती झाली आणि ‘गुरुदेवांनी त्या चिन्हाच्या रूपात सर्व साधकांना संरक्षककवच दिले आहे’, असे मला वाटले.

टीप – ब्रह्मोत्सवाची आठवण रहावी; म्हणून साधकांना दिलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असलेले गोल चिन्ह

आ. ब्रह्मोत्सव चालू झाल्यावर ‘सर्व साधक वैकुंठलोकात आहेत’, असे मला वाटले. सर्व साधकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता.

इ. ‘कार्यक्रमस्थळी सर्व देवता आलेल्या आहेत’, असे मला जाणवले.

ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सोनेरी रथात पाहून माझी भावजागृती झाली. ‘तो रथ भूमीवर नसून अधांतरी जात आहे आणि दिंडीतील साधकही अधांतरी चालत आहेत’, असे मला वाटले.

उ. ब्रह्मोत्सवाचे दैवी वातावरण ‘याची देही याची डोळा’ पहायला मिळाले आणि गुरुदेवांनी ‘न भूतो न भविष्यति ।’ असा ब्रह्मोत्सव सोहळा अनुभवायला दिला. याबद्दल कृतज्ञता वाटून माझा कंठ दाटून येत होता.

४. श्री. रोहन देसाई

अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी जात असतांना ‘मी धर्मरथात बसलो आहे. माझी गाडी मी चालवत नसून गुरुदेवच चालवत आहेत आणि प्रत्येक प्रवेशद्वारातून प्रवेश करतांना माझ्यावर चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

आ. सोहळ्याच्या ठिकाणी जात असतांना मला उष्णतेचा त्रास जाणवला; पण निवेदिकेने सांगितल्यानुसार मी नामजप चालू केल्यावर माझा त्रास उणावला.

इ. सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा आवाज श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासारखा वाटला. तसेच ‘विनायकदादा गुरुदेवांनी दिलेले सुवर्णाचा मुलामा दिलेले ताम्रपत्र वाचत असतांना ‘गुरुदेवच ते वाचत आहेत’, असे मला जाणवले.

ई. रथारूढ झालेल्या गुरुमाऊलीला पाहिल्यावर मला एक विलक्षण शक्ती जाणवली आणि शरिरावर रोमांच येऊन माझी भावजागृती झाली.

उ. गुरुमाऊलीचा रथ आमच्या समोर येऊन थांबल्यावर माझे मन निर्विचार झाले.

५. सौ. स्वाती कुलकर्णी

५ अ. भावजागृती होऊन परमानंद अनुभवणे

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान असलेला रथ आमच्या समोर आल्यावर मी नमस्कार केला आणि रथ पुढे गेला. त्या वेळी स्वतःमध्ये ‘एक अद्भुत चैतन्य आले आहे’, असे मला जाणवले.

२. ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’, ही धून ऐकल्यावर मी माझे अस्तित्व विसरून गेले.

३. एक क्षण ‘मी कुठे आहे ? माझ्या सभोवताली काय चालले आहे’, याचे मला भान नव्हते. मी नारायणाशी एकरूप होऊन परमानंद अनुभवत होते.

४. ‘गुरुमाऊलीने माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे’, असे मला जाणवले.

५. माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. घरी गेल्यावरही मी २ दिवस ही भावस्थिती अनुभवली. गुरुमाऊलीने दिलेली ही माझ्यासाठी अमूल्य अशी भेट आहे. मी ती जपून ठेवीन.’

६. सौ. कविता रामदास जल्मी

६ अ. ब्रह्मोत्सवापूर्वी शारीरिक त्रास होणे; परंतु ब्रह्मोत्सवाला गेल्यावर त्रास न्यून होऊन आनंदी आणि उत्साही वाटणे : ‘ब्रह्मोत्सवापूर्वी मला अकस्मात् पुष्कळ ताप येऊन लघवीचा संसर्ग झाला. मी औषधोपचार करूनही माझा त्रास न्यून होत नव्हता. साधकांनी मला ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी निरोप दिल्यावर मला त्रासाची जाणीव झाली नाही. मी ब्रह्मोत्सवाला जाण्याचे ठरवले. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी (११.५.२०२३ या दिवशी) माझा त्रास ८० टक्के उणावला. मला उत्साही आणि आनंदी वाटू लागले.

माझ्यासमोर सतत गुरुदेवांचे रूप येत होते. सोहळ्याच्या ठिकाणी पोचल्यावर मला होत असलेल्या त्रासाची आठवणही झाली नाही. इतका त्रास असूनही मी एका जागेवर पुष्कळ वेळ बसू शकले. केवळ गुरूंच्या कृपेमुळे हे होऊ शकले.’

७. कु. निकुंज नीलेश मयेकर (वय १२ वर्षे)

अ. ‘ब्रह्मोत्सवासाठी बनवलेला रथ लाकडाचा नसून तो सोन्याचा आहे’, असे मला वाटले. त्या रथात मला पुष्कळ तेज जाणवत होते. त्यात आरूढ असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याभोवतीही पुष्कळ तेज जाणवत होते.’

(सर्व सूत्रांसाठी दिनांक ७.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक