उत्तम नियोजनकौशल्य असलेले आणि देवाप्रती अखंड कृतज्ञताभावात रहाणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची झोप म्हणजे गाढ ध्यानावस्था असते.’’ – श्री. वेदांत झरकर (६.९.२०२१)

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणार्‍या शारीरिक त्रासांवर उपचार होण्यासाठी मला त्यांच्या समवेत कुर्ला, मुंबई येथील वैद्य संदेश चव्हाण यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. या कालावधीत मला सद्गुरु राजेंद्रदादांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आधुनिक वैद्यांकडे जातांना केलेली पूर्वसिद्धता !

श्री. वेदांत झरकर

१ अ. ‘साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, यासाठी स्वतःला लागणार्‍या साहित्याची तपाससूची करणे : सद्गुरु दादांनी त्यांना लागणार्‍या साहित्याची वर्गवारीनुसार अत्यंत सुंदर तपाससूची केली, उदा. ‘औषधे, वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट), सेवेचे साहित्य, वैयक्तिक साहित्य’, अशा प्रत्येक साहित्याची वेगवेगळी वर्गवारी केली. त्यामुळे कुठलेही साहित्य घ्यायचे राहिले नाही आणि साधकांचा वेळ वाया गेला नाही.

१ आ. आधुनिक वैद्यांना पहाण्यास सुलभ होईल अशा प्रकारे अतिशय सुव्यवस्थित आणि क्रमवार लावून ठेवलेले वैद्यकीय अहवाल !

१ आ १. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सुव्यवस्थित आणि क्रमवार लावून ठेवलेले वैद्यकीय अहवाल पाहून वैद्यांनी त्यांचे कौतुक करणे : सद्गुरु राजेंद्रदादांनी वर्ष २०११ पासूनचे त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल चांगल्या रितीने सांभाळून ठेवले आहेत. वर्ष २०११ मध्ये वैद्यांनी त्यांना दिलेली औषधांची ‘प्रिस्क्रिप्शन’ही (टीप) त्यांनी जपून ठेवली आहेत. सद्गुरु दादांनी वर्ष २०११ पासून वर्ष २०२० पर्यंतचे त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल वर्ष, मास आणि दिनांक या क्रमानुसार लावून ठेवले आहेत आणि प्रत्येक अहवालाच्या वरच्या कोपर्‍यात त्या अहवालाचे वर्ष लिहून ठेवले आहे. सद्गुरु दादा वैद्यांकडे गेल्यावर सद्गुरु दादांची अहवाल ठेवण्याची पद्धत पाहून ते आनंदाने म्हणतात, ‘‘मी प्रथमच असा रुग्ण पाहिला.’’ (टीप – ‘प्रिस्क्रिप्शन’ : वैद्यांनी रुग्णासाठी लिहून दिलेला औषधांचा कागद)

१ आ २. सर्व प्रकारच्या तपासण्यांच्या स्वतंत्र धारिका (फाईल) करणे : सद्गुरु दादांनी ‘ॲलोपॅथी’ची औषधे, आयुर्वेदिक औषधे, रक्ताच्या चाचण्या, ‘ईसीजी’ आणि अन्य चाचण्या यांच्या वेगवेगळ्या धारिका (फाईल्स) केल्या आहेत. त्यामुळे वैद्यांना वैद्यकीय अहवाल पहायला पुष्कळ सोयीचे होते.

१ आ ३. सद्गुरु राजेंद्रदादांनी सध्या ते घेत असलेली औषधे आणि त्यांच्या वेळा एका स्वतंत्र कागदावर लिहून तो कागद समवेत ठेवणे : सद्गुरु दादा वैद्यांकडे जातांना सध्या ते घेत असलेल्या औषधांची नावे आणि त्या घेण्याच्या वेळा एका कागदावर लिहून ठेवतात. त्यामुळे वैद्यांना सर्व औषधे एकत्रच बघता येतात आणि पुढील औषधोपचारांचा निर्णय घेण्यास सुलभ होते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची ध्यानावस्था !

‘वर्ष २००९ मध्ये मी कर्नाटकच्या दौर्‍यावर होतो. एक दिवस मी मंगळुरू सेवाकेंद्रात असतांना पहाटे ४.३० वाजता श्री. विनायक शानभाग (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांच्या पोटात पुष्कळ दुखत होते आणि त्यांना आध्यात्मिक त्रासही होत होता. त्यामुळे ते नामजपादी उपाय विचारण्यासाठी मला झोपेतून उठवत होते. दुसर्‍या दिवशी त्यांनी मला सांगितले, ‘‘मी तुम्हाला उठवण्याचे बरेच प्रयत्न केले; परंतु तुम्हाला जाग आली नाही.’’ तेव्हा ‘मला जाग कशी आली नाही ?’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण माझी झोप एवढी गाढ नसते. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्या वेळी तुम्ही ध्यानावस्थेत होता; म्हणून तुम्हाला जाग आली नाही.’’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे (वर्ष २००९)

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची साधकांवरील प्रीती !

‘एकदा एक साधिका घरी जाणार होती. त्या वेळी तिच्याकडे भ्रमणभाष नव्हता. त्या साधिकेला आध्यात्मिक त्रास असल्याने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेला एक भ्रमणभाष तिला दिला. सद्गुरु राजेंद्रदादांनी त्या साधिकेला सांगितले, ‘‘तुम्हाला आध्यात्मिक त्रास होऊ लागल्यास नामजपादी उपाय विचारण्यासाठी मला भ्रमणभाष करा.’’

२. वैद्यांकडे उपचार चालू केल्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

२ अ. ‘‘वेदना म्हणजे देवाला आर्ततेने हाक मारण्याचे माध्यम आहे’’, असे सद्गुरु दादांनी सांगणे : वैद्यांनी सद्गुरु दादांकडून २ घंटे वेगवेगळ्या प्रकारे पुष्कळ श्रमाचे व्यायाम करून घेतले. सद्गुरु दादांना व्यायाम करतांना पुष्कळ वेदना होत होत्या, तरीही त्यांच्या तोंडवळ्यावर त्या वेदना दिसत नव्हत्या. ते मला म्हणाले, ‘‘वेदना म्हणजे देवाला आर्ततेने हाक मारण्याचे माध्यम आहे.’’

२ आ. वैद्यांनी सद्गुरु दादांना त्यांच्या चालण्याच्या अयोग्य पद्धतीविषयी सांगितल्यावर सद्गुरु दादांनी ते लगेच स्वीकारणे : ४ घंट्यांच्या तपासणीच्या कालावधीत वैद्यांनी सद्गुरु दादांना त्यांच्या चालण्याच्या अयोग्य पद्धतीविषयी चुका सांगितल्या. सद्गुरु दादांनी त्या सर्व चुका स्वीकारल्या आणि प्रत्येक वेळी त्यांनी ‘प्रयत्न करतो, असे सांगितले.

२ इ. वैद्यांच्या प्रकृतीचा अभ्यास करून त्यांना सनातनच्या कार्याची ओळख करून देऊन सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने देणे : सद्गुरु दादा कोणत्याही वैद्यांकडे गेल्यावर त्या वैद्यांच्या प्रकृतीचा सखोल अभ्यास करतात. सद्गुरु दादा वैद्यांचे बोलणे आणि वागणे यांचा अभ्यास करून त्यांना सनातनच्या कार्याची ओळख करून देतात. सद्गुरु दादा वैद्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने किंवा ग्रंथ भेट देतात.

३. देवाची कृपा आठवून सद्गुरु राजेंद्रदादांचा भाव जागृत होणे

एकदा आम्ही दुपारी वैद्यांकडे गेलो असता अकस्मात् सद्गुरु दादांचा भाव जागृत झाला. त्यांच्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते. मी त्यांना त्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला ठाऊक नाही; पण देवाची कृपा आठवून पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे आणि भाव जागृत होत आहे.’’ सद्गुरु दादांच्या डोळ्यांतून १५ मिनिटे भावाश्रू येत होते. ते पाहून मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

अ. सकाळी ११ वाजताची वेळ असूनही मला वातावरणात सर्वत्र पुष्कळ थंडावा जाणवत होता.

आ. ‘सद्गुरु दादांच्या शरिरातून प्रचंड प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असून वातावरणात चैतन्याच्या लाटा पसरत आहेत’, असे मला जाणवले.

इ. मला चिकित्सालयाच्या बाहेर गरुडाचे जवळून दर्शन झाले.

४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील चैतन्यामुळे चिकित्सालयातील वातावरणात झालेला पालट

सद्गुरु दादांनी वैद्यांकडे उपचाराला जाण्यास आरंभ केला, त्या दिवसापासून मला त्या चिकित्सालयातील वातावरणात पालट झाला आहे’, असे जाणवले.

अ. मला ‘चिकित्सालयाच्या वातावरणातील सात्त्विकता वाढली आहे’, असे जाणवले.

इ. चिकित्सालयाच्या जवळपास गरुड, कोकिळा, भारद्वाज असे सात्त्विक आणि दैवी पक्षी येत होते.

इ. मला चिकित्सालयात सर्वत्र दैवी सुगंध आला.

‘सद्गुरु दादा जेथे जातात, तेथील वातावरणात पालट होतो’, असे मला अनुभवता आले.

– श्री. वेदांत झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.९.२०२१)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेले ज्ञानदायी संभाषण !

‘२.३.२०२१ या रात्री ८.४५ वाजता श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे भ्रमणभाषवर हृदयस्पर्शी संभाषण झाले. मला त्या संभाषणातील शब्द न् शब्द अमृतासम वाटत होता. तेव्हा सद्गुरु दादा बोलत होते, तेवढेच मी ऐकू शकलो. ते संभाषण येथे दिले आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु आणि संत यांनी शारीरिक त्रास सहन करणे, ही एक तपश्चर्याच आहे.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले केवळ त्यांचा संकल्प आणि कृपा यांतून साधकांना घडवतात. परात्पर गुरु डॉक्टरांचे एकेक उदाहरण, म्हणजे सर्वांसाठी आदर्श आहे.

३. देवाने निर्मिलेल्या अब्जावधी गोष्टींपैकी एकही गोष्ट व्यर्थ जात नाही, उदा.

अ. गायीचे शेण : गोवर्‍या आणि अनेक औषधे करण्यासाठी वापर केला जातो.

आ. मेंढीची विष्ठा : भूमी अत्यंत सुपीक होते.

इ. गांडूळ : गांडुळे भूमी सुपीक करण्यास पुष्कळ साहाय्य करतात.

याउलट मानव देवाने दिलेल्या पुष्कळ गोष्टी वाया घालवत असतो.

४. पृथ्वीवरील ७५० कोटी लोकांमध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असणे, हे साधकांचे महत्भाग्य !

संपूर्ण ब्रह्मांडाच्या तुलनेत पृथ्वी सुईच्या टोकाच्या अग्रभागावरील छोट्याशा कणाएवढी आहे. अशा लक्षावधी पृथ्वी, ग्रह, तारे मिळून एक ब्रह्मांड होते. विज्ञान आतापर्यंत अशा केवळ २ कोटी ब्रह्मांडांचा शोध घेऊ शकले आहे. आपण म्हणतो, ‘अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो (देव किंवा गुरु) नायक आहे.’ पृथ्वीवरील ७५० कोटी लोकांमध्ये सनातन संस्थेत केवळ काही सहस्रो साधक आहेत. आपले किती महत्भाग्य ! देवाची आपल्यावर किती कृपा आहे !

५. या जगात साधना करणार्‍या जेवढ्या प्रकृती आहेत, त्या सगळ्यांमधील एकेक प्रकृती देवाने सनातनमध्ये पाठवली आहे.

६. सनातन संस्थेचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. सनातनमध्ये असलेल्या विविध प्रकृतींचा प्रचंड मोठा अद्भुत इतिहास लिहिला जाईल.

७. देवाच्या अद्भुत निर्मितीचा मानवाला अजूनही शोध लागलेला नसणे

देवाने मानवी शरिराची केलेली निर्मिती फार सुंदर आहे. त्यात एकही चूक नाही. केवळ पायाचा तळवा पाहिला, तर त्यात १४ सांधे आहेत. त्यामुळे आपण सरळ, उंचवटा असलेल्या किंवा खडबडीत अशा कुठल्याही प्रकारच्या भूमीवर पाय ठेवला, तरी आपला पाय घट्ट रहातो. देवाने आपला एकेक अवयव अद्भुतरित्या निर्माण केला आहे. त्याचा मानव अजूनही शोध लावत आहे.

८. सद्गुरु राजेंद्रदादा यांचा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती असलेला भाव !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांना आलेल्या अनुभूती आणि सप्तर्षींकडून मिळालेले ज्ञान यांविषयीची सूत्रे सांगत असतांना सद्गुरु राजेंद्रदादा वही आणि लेखणी घेऊन बसले होते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ जे सांगत होत्या, ते सद्गुरु दादा लिहून घेत होते. ते संभाषणाची सांगता करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना म्हणाले, ‘‘मला आशीर्वाद द्या.’’

संग्राहक : श्री. वेदांत झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.९.२०२१)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.