गोवा : धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) : अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे; मात्र या ऐतिहासिक घटनेनंतर राज्यात सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे अनुभवास आले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली. या शिष्टमंडळामध्ये ‘धर्मजागृती सेवा समिती’चे सर्वश्री प्रवीण चंद्र चौधरी, जनजागृती सेवा संघाचे प्रकाश कुमार मिश्रा, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांचा सहभाग होता.

याविषयी श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे का ? याचे अन्वेषण करावे. गोव्यात बांगलादेशी घुसखोरांनी पारपत्र घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी सरकारने अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथक नेमावे.’’

हलाल उत्पादनांच्या विक्रीवरही बंदीची मागणी

उत्तरप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यातही हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी आणावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.