संपादकीय : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

कर्नाटकातील हिंदू

पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्‍यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ? अशी शंका येण्यासारखे सरकारचे सध्याचे वर्तन दिसून येत आहे. देशात एकीकडे कोट्यवधी हिंदू रामसंकीर्तनात मग्न असतांना दुसरीकडे कर्नाटकातील काँग्रेस सरकारची आसुरी प्रवृत्ती जागृत झाली आहे. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रकरणी कर्नाटक सरकारने राज्यातील आंदोलकांवर कारवाई करण्याचा हिंदुद्वेषी निर्णय घेत ५ डिसेंबर १९९२ या दिवशी घडलेल्या एका प्रकरणात श्रीकांत पुजारी या हिंदूला आता अटक केली. कर्नाटक पोलिसांनीही तत्परतेने एक पथक स्थापन करून या आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० हिंदूंची सूची बनवली. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. यावरून ‘भक्तांनी केलेला देवाचा धावा सहन न होणारे असुर आणि कर्नाटक सरकारची प्रवृत्ती यांत काय भेद आहे ?’, असा प्रश्न कुणाला पडल्यास त्यात चुकीचे काय ? कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे, तेही यावरून लक्षात येते. याच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांवरील गुन्हे मागे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. वर्ष २००९ मध्ये कर्नाटकात भाजप सत्तेत असतांना पी.एफ्.आय.च्या १ सहस्र ६०० सदस्यांविरुद्ध १७५ गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये काँग्रेसचे आमदार तन्वीर सैत यांनी हे सर्व जण ‘निर्दाेष’ असल्याचे सांगत त्यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली. त्यानंतर वर्ष २०१५ मध्ये सिद्धरामय्या यांनी १७५ गुन्हे मागे घेतल्याची माहिती सैत यांनीच दिली होती. आज सिद्धरामय्या यांनी रामभक्तांना बेड्या ठोकण्याचा आदेश ज्या पोलिसांना दिला आहे, त्याच पोलीसदलाचे मत न घेता त्यांनी तेव्हा पी.एफ्.आय.च्या सदस्यांवरील १७५ गुन्हे कुठलाही पुढचा-मागचा विचार न करता मागे घेण्यासाठी पावले उचलली होती, हे जनता कदापि विसरणार नाही. गुन्हा नोंदवलेल्या पी.एफ्.आय.च्या सदस्यांना ‘कोडागु, मैसुरु आणि मंगळुरू या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचा गळा कसा कापायचा ?’, ‘दंगली कशा भडकावायच्या ?’ आदींचे प्रशिक्षण दिले जात होते. इतकेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी ‘पी.एफ्.आय. वर बंदी घालायचा प्रश्नच नाही’, असे विधान केले होते.

सांगायचे तात्पर्य इतकेच की, एकीकडे दंगली भडकावण्याचे प्रशिक्षण घेणार्‍या आतंकवाद्यांना ‘निर्दाेष’ ठरवून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणारी काँग्रेस, दुसरीकडे निर्दाेष रामभक्तांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकते ! यापेक्षा मोठा हिंदुद्वेष तो कुठला ? आता कर्नाटकातील भाजपने काँग्रेस सरकारविरुद्ध दंड थोपटले असून हिंदूंचे अटकसत्र थांबवण्याची आणि अटकेतील हिंदुत्वनिष्ठांना सोडण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात आतापर्यंत जिहाद्यांनी सर्वाधिक हिंदूंच्या हत्या केल्या आहेत, त्यांच्या मारेकर्‍यांना पकडण्याचे धाडस हेच सिद्धरामय्या का दाखवत नाहीत ? त्यामुळे प्रश्न असा पडतो की, केवळ निवडणुकीच्या काळात मंदिरांत जाऊन स्वतः ‘हिंदु’ असल्याचे जगाला दाखवणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सिद्धरामय्या यांच्या या हिंदुद्वेषाविषयी नेहमी गप्प का बसतात ? उलट काँग्रेसचे एच्. अंजनेय यांच्यासारखे नेते सिद्धरामय्या हे ‘राम’ असल्याचे म्हणतात. तथापि ‘सध्याच्या राममय वातावरणात हिंदूंना डिवचणार्‍यांना सिद्ध‘राम’य्या म्हणायचे का ?’, असा प्रश्न कुणाला पडल्यास त्यात चूक काय ?