‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत सेवा करतांना आलेल्‍या अनुभूती !

१. ‘या वर्षी पावसाळा उशिरा चालू झाला. त्‍यामुळे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत पाऊस नव्‍हता. एरव्‍ही महोत्‍सवाच्‍या मुख्‍य सभागृहाच्‍या ओवरीत (व्‍हरांड्यात) पावसाची मोठी गळती होऊन पुष्‍कळ पाणी साचते. तसेच वेताळ सभागृहाच्‍या जिन्‍याच्‍या पायर्‍यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी खालच्‍या बाजूला वहात असते. महोत्‍सवाच्‍या काळात पाऊस चालू झाला असता, तर अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि साधक घसरून पडण्‍याची शक्‍यता होती. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर असुविधा निर्माण झाली असती. पाऊस न पडल्‍यामुळे हा महोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडला.

२. गुरुकृपेने मला स्‍वच्‍छतेच्‍या सेवेचे दायित्‍व मिळाले होते. स्‍वच्‍छता करणार्‍या सर्व साधकांनी मिळून पावसाचे पाणी काढून स्‍वच्‍छ करायचे म्‍हटले असते, तरी शक्‍य झाले नसते.

३. प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता करतांना काही हिंदुत्‍वनिष्‍ठांनी मला नमस्‍कार केला आणि ते म्‍हणाले, ‘‘तुमची सेवा पुष्‍कळ चांगली आहे. मागील वर्षीच्‍या तुलनेत यंदाची स्‍वच्‍छता चांगली आहे.’’ त्‍या वेळी मी गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

‘गुरुदेवा, तुम्‍हीच आमच्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित अशी साधना करून घेतलीत. ‘महोत्‍सवाच्‍या काळात पाऊस न पडल्‍याने भगवंताने साधकांची कशी काळजी घेतली ?’, हे यावरून दिसून येते. त्‍याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !’

– श्री. कालिप्रसाद कृष्‍णाजी सारंग, जिल्‍हा सिंधुदुर्ग (३०.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक