झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक

२ गटांनी एकमेकांवर दगडफेक करत बाँब फेकले : जमावबंदी लागू

धनबाद – कतरास येथे ३० जून या दिवशी इ-रिक्शाची बॅटरी चोरीला गेल्याच्या प्रकरणी २ गटांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर २ गटांमध्ये दगडफेक करण्यासह एकमेकांवर बाँबही फेकण्यात आले.  या दंगलीत १२ जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना अटक केली असून या एका महिलेचा समावेश आहे.

या घटनेनंतर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला. त्यामुळे दुसर्‍या गटातील लोक संतप्त झाले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला.