वाराणसीतील गंगानदीच्या मणिकर्णिका आणि हरिश्‍चंद्र घाटांवरील अंत्यसंस्कारांची जागा पालटली !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – गंगानदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे येथील  पारंपरिक मणिकर्णिका आणि हरिश्‍चंद्र या घाटांवरील अंत्यसंस्कारांची जागा पालटण्यात आली आहे. या घाटांवरील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करतांना अडचणी येत आहेत. हरिश्‍चंद्र घाटावर पायर्‍यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत, तर मणिकर्णिका घाटावर उंच मचाणावर अंत्यसंस्काराचे काम चालू आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या कामालाही विलंब होत आहे.

डोम राजा घराण्यातील लोकांचे म्हणणे आहे की, आता गंगानदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढेल. त्यामुळे समस्या आणखी वाढतील. डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे गंगानदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या येथील घाटाच्या पायर्‍यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.