विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांची नावे संमत न झाल्याने विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद

सभागृहात वाद घालणारे नकोत, तर वाद सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवूनही अद्याप त्या नावांना संमती देण्यात आलेली नाही. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘राज्यपालनियुक्त सदस्यांना संमती देऊन लोकशाही जिवंत ठेवावी’, असा टोला विरोधकांना लगावला. यावरून विधानसभेत गोंधळ निर्माण झाला.

अनिल परब यांच्या विधानावर सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यपालांचे निर्णय पक्ष ठरवतो का ?’, अशी विचारणा अनिल परब यांना केली. विविध शासनमान्य समित्यांमध्ये सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही विरोधकांनी या वेळी केली. त्यावरून सभागृहात हा वाद निर्माण झाला. या वेळी सभागृहाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हस्तक्षेप करून वाद थांबवला.