भारत ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ असल्याचा भ्रम असून भावी ‘हिंदु राष्ट्र’ हे खर्‍या अर्थाने पंथनिरपेक्ष असेल !

भारताच्या राज्यघटनेत भारत हे ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. ‘विविधतेत एकता’, हे भारतीय विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या तिरंगा ध्वजातही सर्व पंथांना स्थान दिले आहे. असे असतांना देशात पुढील गोष्टी कशा घडतात ?

पू. संदीप आळशी

१. वर्ष १९८० च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंची शेकडो देवळे उद्ध्वस्त केली गेली. अनेक वर्षांपासून काही दुष्ट प्रवृत्तीच्या पंथियांकडून हिंदूंचे उत्सव आणि मिरवणुका यांवर दगडफेक केली जाते अन् दंगली माजवल्या जातात. काही संकुचित प्रवृत्तीच्या पंथियांकडून हिंदूंना पैशांचे आमिष दाखवून किंवा कपटाने त्यांचे धर्मांतर केले जाते. या सर्व दुष्प्रवृत्तींना मोडून काढण्यासाठी आतापर्यंत शासन पातळीवर घटनात्मक मार्गाने प्रभावी उपाय न केले गेल्यामुळे अजूनही या दुष्प्रवृत्ती भारतात आहेतच. देशात आजही ‘धर्मांतरविरोधी’ कायदा लागू नाही.

२. भारताच्या राज्यघटनेत ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला गेला आहे. असे असतांनाही आजही ‘गोहत्या बंदी’चा कायदा देशातील बर्‍याच राज्यांमध्ये लागू नाही.

‘सर्व पंथांनी एकमेकांचा आदर राखावा’, या भारताच्या ‘सेक्युलर’ विचारधारेत वरील सर्व बसते का ? भारतात बहुसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या धर्मभावनांचे काहीच मूल्य नाही का ? याउलट हिंदूंनी अन्य पंथियांचे उत्सव वा मिरवणुका यांवर आक्रमण केल्याचे किंवा अन्य पंथियांचे सक्तीने वा त्यांना फसवून त्यांचे धर्मांतर केल्याचे एक तरी उदाहरण आहे का ?

३. भारतात पंथाच्या आधारे आरक्षण, तसेच अन्य सुविधा देणे राज्यघटनेनुसार चुकीचे असतांना अल्पसंख्यांकांना पंथाच्या आधारे आरक्षण अन् अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र हिंदूंना पंथाच्या आधारे कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.

वरील सर्व गोष्टींवरून खेदानेच म्हणावे लागते, ‘भारत हे पंथनिरपेक्ष राष्ट्र नाहीच !’

भावी हिंदु राष्ट्रात पंथाच्या नावावर पंथियांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्व पंथियांच्या त्यांच्या त्यांच्या पंथांविषयीच्या भावना यथायोग्य जपल्या जातील. कोणी अन्य पंथियांच्या भावनांची पायमल्ली केली, तर त्याला कायद्यानुसार कडक शासन केले जाईल, जेणेकरून पुढे अन्य कुणाचे तसे करण्याचे धाडस होणार नाही. यासाठीच हिंदु राष्ट्र हे खर्‍या अर्थाने ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र बनेल !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (८.११.२०१९)