हडपसर (जिल्हा पुणे) येथील ‘हिंदु धर्मरक्षक’ मेळावा !

हडपसर (जिल्हा पुणे), १८ फेब्रुवारी (वार्ता.) – आजपर्यंत एकच धर्म होता, आहे आणि राहील, तो म्हणजे हिंदु धर्म ! भारतीय संस्कृतीची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. महिलांना हिंदु धर्मात विशेष स्थान आहे; म्हणूनच राधाकृष्ण, सीताराम म्हटले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. मतदान करतांना ‘आपण सनातनी आहोत’, हे लक्षात ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. येथील देवाची उरुळी येथे झालेल्या ‘हिंदु धर्मरक्षक’ मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या वेळी धर्मरक्षणाचे कार्य करणार्या धर्मवीरांना ‘गौरव पुरस्कार’ देण्यात आला.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले की,
१. आई ही अशी शक्ती आहे, जी सर्वांवर परोपकार करते. आई हे त्रिकाल सत्य आहे, जे कुणी पालटू शकत नाही. महिला हे झाडाचे मूळ आहे, पुरुष झाडाचे पान आहे. सर्वच आई-वडिलांनी तरुणांना बाहेरच्या देशात पाठवल्यानंतर भारताचे रक्षण कोण करणार ?
२. हिंदु-मुसलमान कधीच एक होऊ शकत नाहीत, एकीकडे शहाजहानचे ४ पुत्र होते, एकाला राजा घोषित केला असता औरंगजेबाने सत्तेसाठी भावाची हत्या केली, दुसरीकडे प्रभु श्रीरामाने वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी राज्याचा त्याग केला. यामुळे आपली संस्कृती आणि त्यांची विकृती एक कशी होईल ?
३. आपल्या भोळेपणाचा अपलाभ घेतला गेला, प्रवचनकारांनी कथा करणे चांगले आहे, स्वार्थासाठी कथा करणे महापाप आहे, आपल्या प्रारब्धात एखादी गोष्ट असेल, तर निश्चित मिळणार आहेच, असे आपला धर्म सांगतो.
४. मी केलेल्या मार्गदर्शनाचे चिंतन करा, मनन करा, निश्चय करा. मी सनातनी आहे. ‘सनातनीला समाजात कुणी त्रास देत असेल, तर तो माझा त्रास आहे’, असा भाव ठेवा.