जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज त्यांना पुरस्कार देऊन गौरवतांना डावीकडून १. आमदार भास्कर जाधव, २. आमदार शेखर निकम आणि अन्य मान्यवर

चिपळूण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्‍यांना समर्पित करतो. ‘तुम्ही जगा आणि दुसर्‍याला जगवा’, या विचारांनी मी काम करतो’, असे मार्गदर्शन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी येथे केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महासंघाच्या रत्नागिरी शाखेने १३ आणि १४ फेब्रुवारी या दिवशी कीर्तन महोत्सव आणि समाजासाठी आदर्शवत असलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल समोरील मैदानावर आयोजित केला होता.

या वेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला नागरिक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव, दिलीप दादा जगताप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी स्व. माजी खासदार गोविंदराव निकम, स्व. नाना जोशी,  स्व. राजाराम शिंदे, स्व. बाळासाहेब माटे, स्व. केशवराव भोसले यांना त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. त्यांच्या नातेवाइकांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दैनिक ‘रत्नागिरी टाईम्स’चे संपादक उल्हासराव घोसाळकर, गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण सामंत, सदाशिवराव भोसले, प्रकाशजी देशमुख, ह.भ.प. कोकरे महाराज, विनोद चाळके आणि आशिफ बामणे यांना ‘मराठा समाज भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. योगिता खाडे यांना ‘शौर्य पुरस्कार’, तर हरिया दादा सावंत यांना ‘क्रिडा पुरस्कार’ देण्यात आला. त्यांच्यासह समाजासाठी कार्य करणार्‍या बांधवांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.