Andhra Pradesh Sadhu Parishad : मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’चे अध्यक्ष स्वामी श्रीनिवासानंद संमेलनात बोलताना

श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) – हिंदु मंदिरांच्या अतिक्रमण करून बळकावलेल्या भूमीविषयी अन्वेषण करण्याची मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’ने केली. यासाठी महसूल आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांसह एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’चे अध्यक्ष स्वामी श्रीनिवासानंद यांनी केली. हिंदु मंदिरांच्या भूमींवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी परिषदेने पोंदुरू येथे ‘हिंदु धार्मिक संमेलन’ आयोजित केले होते.

सरकार, मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी बळकावल्या आहेत मंदिरांच्या भूमी !

या वेळी स्वामी श्रीनिवासानंद म्हणाले, ‘‘मंदिरांच्या भूमी केवळ सरकारी संस्था किंवा राजकारणी यांनी हडप केलेल्या नाहीत, तर मुसलमान आणि ख्रिस्ती समुदायांतील लोकांनीही बळकावलेल्या आहेत. राज्यातील सिंहचलम्, अन्नावरम्, श्री कलाहस्ती आणि इतर मंदिरांच्या मालकीची अनुमाने २५ सहस्र एकर भूमी बळकावण्यात आली आहे. हिंदु संघटना तिरुपति शहराच्या विकासासाठी तिरुपति देवस्थानचा निधी वळवण्याला अनुमती देणार नाहीत.’’ या प्रसंगी राज्यात विविध ठिकाणी हिंदु धर्माच्या अनुयायांवर होणार्‍या आक्रमणांविषयी अनेक धर्मगुरूंनी चिंता व्यक्त केली.

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात साधूंची आंदोलने !

आंध्रप्रदेश साधू परिषद आणि इतर हिंदु संघटना यांनी सरकारच्या नियंत्रणातून हिंदु मंदिरे मुक्त करण्यासाठी आंदोलने चालू केली आहेत. ‘काही राजकीय नेते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी मंदिरांचा पैसा विकासाच्या नावाखाली हडप करतात’, असा आरोप या वेळी करण्यात आला. (भाविकांच्या अर्पणातून जमा झालेला मंदिरांचा पैसा विकासासाठी वापरणार्‍या राज्यकर्त्यांनी चर्च आणि मशिदी यांचा पैसा विकासासाठी वापरण्याचे धाडस कधी केले आहे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • आंध्रप्रदेशमधील हिंदुद्वेषी जगनमोहन रेड्डी सरकारच्या राजवटीत असे अन्वेषण होण्याची सूतराम शक्यता नाही, त्यामुळे आता केंद्र सरकारनेच १०० कोटी हिंदूंच्या भावनांचा मान राखून या प्रकरणाचे अन्वेषण करावे आणि दोषींना आजन्म कारागृहात टाकावे !
  • मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी साधूंना आवाज उठवावा लागणे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंनी आतातरी संघटित होऊन मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे !
  •  हे आहेत मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात हवीत !