(म्हणे) ‘केवळ झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात !’-आमदार जितेंद्र आव्हाड

पाठ्यक्रमातून मोगलांचा इतिहास वगळण्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोटदुखी !

जितेंद्र आव्हाड

मुंबई – शालेय पाठ्यपुस्तकांतून मोगल गेले, मौलाना आझाद गेले, महात्मा गांधी गेले. आता शालेय अभ्यासक्रमातून मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा ‘चार्ल्स डार्विन’सुद्धा काढला. केवळ झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्या आहेत, असे ‘ट्वीट’ करत राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या निर्णयाचा उपहास केला आहे. (‘अशांचे मोगलप्रेम जागृत झाले’, असेच यावरून म्हणायचे का ? – संपादक)

यापूर्वीही अफझलखानाची कबर हटवल्यावरून आव्हाड यांनी सरकारवर टीका केली होती. ‘औरंगजेब क्रूर नव्हता’, असे मोगलप्रेमी वक्तव्य आव्हाड यांनी काही मासांपूर्वी केले होते. केंद्रशासनाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) पाठ्यपुस्तकांतून मोगलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मोगलांच्या इतिहासाऐवजी येत्या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकांमध्ये भारतामधील राष्ट्रपुरुषांच्या पराक्रमाचा इतिहास समाविष्ट केला जाणार आहे.