भेंडी बाजारात दुकाने उघडी असतात मग केवळ हिंदूंच्या वस्तीत कारवाई का ? – संदीप देशपांडे, नेते, मनसे

अशा प्रकारे दुजाभाव करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच इतर अधिकार्‍यांवर जरब बसेल !

भेंडी बाजारात दुकाने उघडी (प्रातिनिधिक चित्र )

मुंबई – भेंडी बाजारात दुकाने उघडी असतात, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणीमध्ये दुकाने उघडी असतात. प्रशासन तिथे कारवाई करत नाही. केवळ हिंदूंच्या विभागामध्ये कारवाई केली जाते, असे का ?, असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून केला आहे.

सध्या घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाची हानी होत आहे. काही वसुली करणार्‍यांमुळे हे व्यापारी त्रस्त झाले आहेत आणि म्हणूनच त्यांनी आंदोलने केली. मला चौकशीला बोलवावे, होणार्‍या वसुलीच्या संदर्भात मी माहिती देईन, असेसुद्धा संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.