ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जून या दिवशी देशभरात करण्यात येत असलेल्या ऑनलाईन आंदोलनाच्या निमित्ताने…

भारत त्यातही विशेषकरून महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांनी नटलेला आहे. हे गड-किल्ले केवळ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. एवढेच नाही, तर प्रत्येक गड-किल्ल्याला आपल्या पूर्वजांचा अतुलनीय पराक्रम आणि बलीदान यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे किल्ले आपल्या पराक्रमी पूर्वजांची साक्ष देणारे आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्या देखरेखीचे दायित्व हे पुरातत्व खात्याकडे आहे; पण आज त्याची दूरवस्था झालेली आहे. या किल्ल्याचा इतिहास, सध्याच्या किल्ल्याची झालेली पडझड, तेथे पसरलेले अस्वच्छतेचे साम्राज्य आणि गड-किल्ल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

श्री. प्रशांत जुवेकर

१. किल्ल्याचा दैदिप्यमान इतिहास

अठराव्या शतकात म्हणजे पेशवाईत उभारलेल्या या भुईकोटचा इतिहास दैदिप्यमान आहे. पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा वर्ष १७२७ मध्ये जहागीरदार हरि सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकीर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. त्यानंतर हे गाव व्यापारी पेठ म्हणून भरभराटीस आले. वर्ष १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि हिंदवी स्वराज्य लयास गेले. संपूर्ण भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली.

वर्ष १८२१ मध्ये पारोळा आणि आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन बंड उठले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खुनाचा प्रयत्न झाला. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी साहाय्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि इंग्रजांनी जहागीरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. वर्ष १८५९ मध्ये इंग्रजांनी किल्ला आणि शहर कह्यात घेतले. वर्ष १८६० मध्ये जहागिरी खालसा (संपुष्टात) केली. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशीची शिक्षा दिली. तसेच किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष आजही तेथे आढळतात. राणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरचे वंशज म्हणजे तांबे घराणे आजही पारोळा गावात रहातात.

२. खंदक

खंदकात तरंगत असलेला कचरा आणि त्यामुळे अस्वच्छ झालेले त्यातील पाणी

किल्ल्याच्या चारही बाजूंना तटबंदीभोवती दगडांनी बांधलेला २० फुटी खोल खंदक आहे. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये, यासाठी खंदकात मगरी सोडल्या जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नसे. सध्या या खंदकाच्या काठावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही; पण आतील बाजूने पाहिल्यास पाण्यात बाटल्या आणि इतर कचरा तरंगतांना दिसतो.

३. बुरुजांचे सौंदर्य नष्ट होणे

ढासळलेल्या बुरूजांमुळे त्यांचे आणि किल्ल्याचे सौंदर्य नष्ट होणे

किल्ल्याच्या आत आल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकर्‍यांसाठी देवड्या (पहारेकर्‍यांना उभे रहाण्यासाठीची जागा) दिसतात. त्यांना लागूनच घोड्यांसाठी पागा आहे. खंदकाला लागून २० फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीवरून जाण्यासाठी फांजी (तटबंदीच्या शेजारून येण्या-जाण्यासाठीचा मार्ग) आहे. तटबंदीमधे शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या (तटबंदीवरून शत्रूवर आक्रमण करतांना बंदूक ठेवण्याची जागा) असून वर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. तटबंदीत ११ बुरुज आहेत. इंग्रजांनी ‘या ठिकाणी काही संपत्ती सापडेल’, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.

पूर्वेला महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे एक भुयार असून ते ८ किलोमीटरवर असलेल्या नागेश्वर मंदिरात उघडते, असे म्हटले जाते. गडावर अजून दोन ठिकाणी या भुयाराचा मागोवा दिसतो. बालेकिल्ल्याच्या बुरुजाला लागून गणपतीचे मंदिर आहे. दोन हौद आणि १० विहिरी आहेत. आजही त्यांची रचना जशीच्या तशी दिसते. एके ठिकाणी पाणी काढण्यासाठी रहाट आहे. यावरून गड पाण्याने समृद्ध होता, असे दिसते.

किल्ल्याचे ढासळत चाललेले बुरूज आणि त्यांची झालेली पडझड

४. कमालीची अस्वच्छता असणे

किल्ल्याची देखरेख नसल्याने तेथे अस्वच्छता आहे. अनेक भागांची पडझड झाली आहे. घनदाट वृक्ष-वेलींमुळे भग्नावस्था आली आहे. काही नागरिक आजही किल्ल्याचा शौचालय आणि मुतारी म्हणून वापर करतात. त्यांना कोणतीही भीडभाड नाही. किल्ल्याच्या आत प्रवेश करण्यास कुणाचीही अनुमती घ्यावी लागत नसल्याने अनेक लोक परिसरात मद्य पिणे, जुगार खेळणे, विश्रांती घेणे अशी कृत्ये सर्रासपणे करतात. तेथील परिसरात अस्वच्छता आणि कचरा यांचे साम्राज्य दिसते. आतमध्ये डुकरांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. येथे कोणत्याही प्रकारची ऐतिहासिक माहिती देणारा फलक लावलेला दिसत नाही.

किल्ल्याची अशी एवढी दयनीय अवस्था पाहून प्रश्न पडतो की, पुरातत्व विभाग नेमके करतो काय ? त्या विभागाकडे नेमके काम काय असते ?

किल्ल्याच्या तटबंदीची झालेली दूरवस्था आणि त्याची होत असलेली पडझड

५. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता !

हे केवळ पारोळा येथील किल्ल्याच्या संदर्भात आहे, असे नाही. आपण जर नीट लक्ष दिले, तर आपल्याला लक्षात येईल की, महाराष्ट्रात अशी अनेक ऐतिहासिक मंदिरे, किल्ले आणि समाधीस्थळे आहेत. त्यांची वर्तमान अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्याला कारणीभूत सर्वस्वी पुरातत्व विभागाने केलेले दुर्लक्ष आणि नागरिकांची तेवढीच उदासीनता आहे. हिंदूंनीच आता आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत.

६. सरकारकडून गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होईल, ही अपेक्षा !

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गड-किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि त्यांचे टप्प्याप्प्याने संवर्धन करण्यासाठी पाऊल उचलले असून दुर्गप्रेमींनी गड-किल्ल्यांविषयीच्या सूचना अन् प्रस्ताव त्वरित ‘मुख्यमंत्री संकल्प कक्षा’ला पाठवण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श पथावर मार्गक्रमण करणारा पक्ष सरकारमध्ये असल्याने त्यांच्याकडून गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होईल, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

संकलक – श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव समन्वयक, हिंदु जनजागृती समिती