तमोगुणी ‘फास्ट फूड’ !

आताच्या काळात बर्‍याच मुलांना पिझ्झा, बर्गर, चिप्स असे पदार्थ आवडतात. त्यामुळे ती मुले आई-वडिलांजवळ हट्ट करून ते पदार्थ मागून खातांना आढळतात. या पदार्थांनाच ‘फास्ट फूड’ असे म्हणतात. हे सर्व पदार्थ भारतीय नसून पाश्‍चात्त्य देशांतून आपल्याकडे आले आहेत. पाश्‍चात्त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्यामुळे सध्या भारतात ‘फास्ट फूड’ नावाची चंगळवादी संस्कृती पसरली आहे. ‘फास्ट फूड’ बाह्यतः चवीला चटपटीत लागत असले, तरी तो तमोगुणी आहार असल्याने त्याचे शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दुष्परिणाम होतात.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१. शारीरिक दुष्परिणाम

पिझ्झा, बर्गर, चिप्स इत्यादी ‘फास्ट फूड’ म्हणजे कृत्रिम आणि प्रक्रिया केलेले शिळे अन्न ! असे कृत्रिम अन् प्रक्रिया केलेले शिळे अन्न सतत खाल्ल्याने ते शरिरासाठी घातक ठरते.

अ. ‘फास्ट फूड’ पचण्यास जड असते. ते खाल्ल्याने पचनसंस्था बिघडते.

आ. विदेशात ‘फास्ट फूड’ आणि कृत्रिम शीतपेये यांच्या अतिरिक्त सेवनामुळे मुलांचा लठ्ठपणा वाढत आहे अन् त्यांचे तोंडवळे (चेहरे) विकृत दिसत आहेत.

इ. ‘फास्ट फूड’मुळे शरिराचा लठ्ठपणा वाढून माणसाचे आयुष्य घटू शकते ! : ‘फास्ट फूड’मुळे शरिराचा लठ्ठपणा वाढून माणसाचे आयुष्य घटू शकते. ब्रिटनमधील सर डेव्हिड किंग यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणार्‍या एका पथकाने या लठ्ठपणामुळे माणसाचे आयुष्य १३ वर्षांनी घटू शकते, असे म्हटले आहे.’ – दैनिक गोमन्तक, २०.१०.२००७

२. बौद्धिक दुष्परिणाम

‘चायनिज फूड’सुद्धा ‘फास्ट फूड’मध्ये गणले जाते. त्यात वापरला जाणारा ‘अजिनोमोटो’ हा पदार्थ बुद्धीसाठी हानीकारक आहे.

३. आध्यात्मिक दुष्परिणाम

‘फास्ट फूड’ पुष्कळ वेळ साठवून ठेवले जाते. त्यामुळे त्यातील तमोगुण म्हणजे वाईट गुण वाढतो. अशा तमोगुणी पदार्थाकडेे वाईट शक्ती आकृष्ट होतात. त्यामुळे ‘फास्ट फूड’ खाणार्‍या व्यक्तीची वृत्ती तामसिक बनते. व्यक्तीची वृत्ती तामसिक बनल्यामुळे व्यक्तीमधील राग, चिडचिडेपणा, हेकेखोरपणा आदी दुर्गुण वाढतात. त्यामुळे त्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होण्याची शक्यताही वाढते.

‘मांसाहारी बर्गर’मध्ये त्रासदायक शक्ती कार्यरत असणे

‘मारलेल्या प्राण्याच्या मांसाचा ‘बर्गर’ बनवण्यासाठी उपयोग करतांना त्यात अधिक प्रमाणात त्रासदायक शक्ती येते. मांसातील ही त्रासदायक शक्ती बर्गरमध्येही कार्यरत असते.

वाईट शक्ती बर्गरमधील २-३ साहाय्यक माध्यमांचा वापर करून त्रासदायक शक्ती पसरवणे, ती वाढवणे, तिचे वितंचन (फर्मेन्टेशन) करणे, तसेच बन (पावासारखा प्रकार) अन् ते बर्गर खाणार्‍याचे शरीर यांमध्ये त्रासदायक शक्ती चिकटवणे, असे करते.

वाईट शक्ती वापरत असलेली साहाय्यक माध्यमे

१. चीज : हे बर्गर आणि बन यांना एकत्र चिकटण्यासाठी साहाय्य करते. खाणार्‍याच्या शरिरामध्ये चीज चिकटते अन् आंबते. यामुळे बर्गर पोटात अधिक काळ रहाण्यास साहाय्य होते. जेव्हा ते बर्गर पोटात किंवा आतड्यात अधिक काळ रहाते, तेव्हा वाईट शक्तींना रक्तप्रवाहात त्रासदायक शक्ती पसरवण्यास अधिक काळ मिळतो. चीजमुळे बर्गरचे अन्न पोटात गोळा (लम्प) बनून रहाते, तसेच ते अन्न आतडे आणि पोटाच्या कडा यांना चिकटण्यासही साहाय्यक होते.

२. मायोनीज : याचे गुणधर्म चीजसारखेच आहेत; परंतु त्याचा आंबण्याचा गुण अधिक प्रमाणात आहे. मायोनीज आणि बनमधील मैदा पोटामध्ये आंबतात. या आंबण्याच्या प्रक्रियेमुळे त्रासदायक शक्तीचे कण पुष्कळ हलके आणि वायुवत होतात; त्यामुळे ते वायू (हवा) अन् रक्त यांच्या माध्यमातून रक्तप्रवाहातून संपूर्ण शरिरात पुष्कळ सहजतेने प्रवास करू शकतात.

३. मैद्याचा बन किंवा पाव : मैद्याचा बन किंवा पाव यांमध्ये ‘स्पंज’प्रमाणे शोषून घेण्याचा गुण आहे; म्हणून चिकनमधील त्रासदायक शक्ती बनमध्ये शोषली जाते. बनमध्ये त्रासदायक शक्तीचा प्रवेश होताच ती बनमध्ये झिरपते आणि वाईट शक्तीचे स्थान निर्माण करते. जेव्हा मैदा, चिकन, चीज आणि मायोनीज शरिरात प्रवेश करतात, तेव्हा ते चिकट गोळा निर्माण करतात अन् तो नंतर आंबतो. त्यानंतर तो पोट आणि आतडे यांत ३६ घंट्यांपेक्षा अधिक काळ राहिल्याने त्रासदायक शक्तीची वाढ होण्यास अन् शरिरात राहून ती रक्तप्रवाहातून शरिराच्या विविध भागांमध्ये जाण्यास पुष्कळ अवधी मिळतो.’

– सौ. भक्ती, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

बर्गर, पिझ्झा आणि इतर ‘फास्ट फूड’ निर्माण करण्यामागचा वाईट शक्तींचा उद्देश

‘बर्गर, पिझ्झा आणि इतर ‘फास्ट फूड’ यांचे मूळ निर्माते वाईट शक्तींच्या प्रचंड प्रभावाखाली होते. ‘बनवण्यास सोपे, लगेच आकर्षित करणारे, पटकन खाता येणारे आणि खाणार्‍याचे शरीर अन् मन यांमध्ये त्रासदायक शक्ती सहजतेने पसरवू शकणारे’, असे अन्नपदार्थ निर्माण करण्यासाठी वाईट शक्तींनी या निर्मात्यांचा वापर केला.’

– सौ. वंदना सतीश वैद्य, अबूधाबी

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.