कानपूर (उत्तरप्रदेश) मंदिरांची भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचे  उघड !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना त्यांच्या श्रद्धास्थानांचे मूल्य नाही ! त्यामुळेच ते असे प्रकार चालू देतात ! ‘अशांना संकटकाळी भगवंताने तरी का वाचवावे ?’ असा प्रश्‍न कुणाच्या मनात आल्यास त्यात चूक ते काय ? असे प्रकार कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडतात का ?

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील चमनगंज येथील काही जुनी मंदिरे पाडून त्यांच्या भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांच्याकडे जुनी मंदिरे पाडून त्यांच्या भूमी बळकावल्या जात असल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर पांडे यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता त्यांना मोडकळीस आलेली मंदिरे लोकांनी बळकावल्याचे, तर अनेक जुनी मंदिरे पाडल्याचे आढळून आले. एका मंदिराला कुलूप लावण्यात आले होते. हे कुलूप उघडण्यास स्थानिक नागरिकांचे सहकार्य न मिळाल्याने शेवटी महापौर पांडे यांनी स्वतःच ते कुलूप तोडले, तेव्हा त्यांना मंदिरात चक्क कचरा भरल्याचा संतापजनक प्रकार दिसून आला. महापौरांनी त्यांच्या समवेत असलेले साहाय्यक पोलीस आयुक्त सीता मऊ यांना अतिक्रमण हटवून मंदिराची स्वच्छता करण्याचा आदेश दिला. यासह महापौरांनी या प्रकरणांची चौकशी करून बिर्याणीच्या दुकानांची सर्व अतिक्रमणे हटवण्याचा आदेश दिला. यासह या सर्व परिसरातील सर्वच मंदिराची पहाणी करण्याचाही आदेश दिला. या प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.