विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांची होणार कोरोना चाचणी

तहसीलदार आशा होळकर यांचे आदेश


सातारा, ३० एप्रिल (वार्ता.) – सातारा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे दळणवळण बंदीमध्येे विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याचेेे उत्तरदायित्व सातारा नगरपालिका आणि पंचायत समिती यांवर सोपवण्यात आले आहे. याविषयीचे आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा तहसीलदार आशा होळकर यांनी काढले आहेत.

गत काही दिवसांपासून विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली आहे. तरीही त्यांची संख्या अल्प होत नव्हती. त्यामुळे विनाकारण फिरणार्‍यांच्या चाचणीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहेे. सातारा शहर आणि तालुका येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तात्काळ विनाकारण फिरणार्‍यांना चाप बसावा यासाठी कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. पालिका आणि पंचायत समितीने पोलिस आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही चाचणी करायची आहे. यासाठी स्वतंत्र पथक सिद्ध करण्याचे सूचित करण्यात आले आहे.