देशात सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्राला ! – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी देहली – देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार केला, तर मग सर्वाधिक लस उत्तरप्रदेशला मिळायला हवी होती; पण तसे झाले नाही, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘कोव्हॅक्सिन’वरून महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांमध्ये राजकारण केले जात आहे. छत्तीसगडमध्ये आम्ही जानेवारीमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे डोस पाठवले होते. २ मासांपर्यंत त्यांनी लसीकरण चालूच केले नाही. मी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले. ‘कोव्हॅक्सिन लस लोकांना देणार नाही’ म्हणत ३ मासांपर्यंत ते केवळ राजकारण करत राहिले. आता मार्चच्या शेवटी लसीकरण चालू केले आहे.